राजेंद्र अंकार ः सकाळ वृत्तसेवा
नाशिक / सिन्नर ः परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी रासायनिक खते फवारूनही जितकं उत्पन्न मिळत नव्हतं त्यापेक्षा जास्त व कसदार उत्पन्न मिळविले; पण आता देशांतर्गत विक्री करायची झाल्यास अत्यल्प दर आणि परदेशात निर्यात होण्यासाठीही अनेक अडचणी, अशा द्विधा स्थितीत उत्पादक अडकला आहे. मुंबईपेक्षा बेंगलोर, गुजरात, बांगला देशात डाळिंबाला चांगली मागणी आहे.
तीन हजार उत्पादक संकटात
पण सध्या सर्वत्रच दर घसरल्याने तालुक्यातील सुमारे तीन हजार डाळिंब उत्पादकांवर चिंतेचे सावट आहे. डाळींब उत्पादक दर्जेदार मालांसाठी नैसर्गीक खतांचा वापर करतात. मात्र मालाचा दर्जा कितीही चांगला असला तरी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे डाळींब उत्पादक अडचणीत येत असल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे बाजार बंद असल्यामुळे पिकलेला माल जात नाही. त्यामुळे लाखोंचे नुकसान होत आहे. माझ्या बागेतील डाळिंबाचं उत्पादन वर्षाला 20 लाखांचं आहे. मात्र सध्या अवकाळी पाऊस, त्यात कोरोनामुळे खुपच नुकसान होत आहे.
-आत्माराम पगार, तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना, पांगरी तथा डाळिंब उत्पादक
------------------
पूर्वी किलोला शंभर रुपये भाव मिळायचा, आता तर 40 रुपये किलोनेही ग्राहक डाळिंब घेत नाही. कोरोनामुळे त्यांना बाजारात जायला भीती वाटते. त्यामुळे मालाला बाजार मिळत नाही.
-शांताराम पगार, डाळिंब उत्पादक शेतकरी, पांगरी
|