ऑनलाइन ज्ञानदानाचा प्रकाश अंधूक; मोबाईलसह रेंजअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान

Educational loss of students
Educational loss of students

नाशिक/येवला : शाळा सुरू असताना ज्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपडावे लागते, त्या आदिवासी मुलांना ऑनलाइन शिक्षण पचनी कसे पडणार. कारण एक तर त्यांना राहायला झोपडी, हाताला काम असेल, तर दोन घास नशिबी पडतात. तेव्हा रेंज आणि अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध असण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल दीड लाख विद्यार्थ्यांचे शाळा बंदमुळे नुकसान होत आहे. ऑनलाइन शिक्षणाचा या विद्यार्थ्यांना फारसा फायदा झाला नसल्याचे पाहणीत समोर आले असून, शिक्षण विभागाने त्यांच्या शिक्षणासाठी व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकूण दोन लाख ६७ हजार ७९४ विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या तब्बल एक लाख ५२ हजार ६०२ असून, अनुसूचित जातीचे १९ हजार ४२४ विद्यार्थी शिक्षण घेतात. यावरूनच जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ६५ टक्के विद्यार्थी आदिवासी व मागास असल्याचे वास्तव आहे. जिल्हा आदिवासीबहुल असल्यामुळे आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांचे वास्तव्य ग्रामीण व वाड्या-वस्त्यांवर आहे.

पाहणीत वास्तव उघड 

सहा महिन्यांपासून सर्व शाळा बंद असल्यामुळे या विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान न भरून निघणारे आहे. तर खासगी शाळांमध्ये मुलांना सर्व ऑनलाइनच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आजही आदिवासी पट्ट्यात कुठलीही सुविधा नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण आजमितीला बंदावस्थेत आहेत. काही उपक्रमशील शिक्षकांनी वस्त्यांवर जाऊन अध्यापन केल्याने त्या विद्यार्थ्यांना थोडेफार तरी शिक्षण मिळाले. यासंदर्भात तक्रारी वाढल्याने बाभूळगाव खुर्द येथील आदिवासी वस्तीत सभापती प्रवीण गायकवाड यांनी भेट दिली असता सहा महिन्यांपासून या विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकच नसल्याचे स्पष्ट झाले.

शासनाने ठोस पावले उचलावीत

तांत्रिक सुविधा, अँड्रॉइड मोबाईल नसल्याने ऑनलाइनचा विषयच नसल्याचे या विद्यार्थी-पालकांनी सांगितले. सधन येवल्यात आदिवासी विद्यार्थ्यांची ही परिस्थिती असेल, तर पेठ, सुरगाणा, कळवण, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी भागांतील आदिवासी मुलांची शिक्षणाची परिस्थिती कशी असेल, याची कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे शासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत व शाळा सुरू करण्यासह उपाययोजनेसाठी पावले टाकण्याची मागणी होत आहे. तर ज्या गावांची हरकत नसेल, तर अशा गावांना शाळा सुरू करण्याची मुभा शासनाने दिली पाहिजे, अशी मागणी सभापती प्रवीण गायकवाड यांनी केली. यासाठी आदिवासी समाज नेते खंडू बहिराम, अरुण मोरे, भाऊराव मोरे, संपत मोरे, संदीप पवार, हिरामण दोडके, भरत पवार, बारकू पवार आदींनी गायकवाड यांची भेट घेतली. 


तालुकानिहाय आदिवासी विद्यार्थी संख्या 
बागलाण- १२८०६ 
चांदवड- ५१५९ 
देवळा- ३९५० 
दिंडोरी- १९१०८ 
इगतपुरी- १०६०१ 
कळवण- ११८४४ 
मालेगाव- १२७७५ 
नांदगाव- ६२०५ 
नाशिक- ९०६८ + १८ 
निफाड- ९८३० 
पेठ- १२८७१ 
सिन्नर- ५२२८ 
सुरगाणा- १५८९४ 
त्र्यंबकेश्वर- १३५३३ 
येवला- ३७१२ 
एकूण- १५२६०२ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com