दिल्लीमधील आंदोलन दलाल अन्‌ राजकारण्यांचे; सदाभाऊ खोत यांचा आरोप

sadabhau khot
sadabhau khot

नाशिक : पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेशमध्ये जो आक्रोश सुरू आहे, तो शेतकऱ्यांचा नसून तेथील बाजार समित्यांमधील दलाल आणि राजकारण्यांचा आहे. त्यांनी दिल्लीतील आंदोलन उभे केले आहे. असा आरोप रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केला. खासगी दौऱ्यावर असताना त्यांनी शुक्रवारी (ता. ४) पत्रकारांशी संवाद साधला. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी ६ डिसेंबरला रयत क्रांती संघटनेतर्फे कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ मुंबईतील आझाद मैदानावर एल्गार होईल. त्यावेळी ‘लुटारूच्या टोळ्या ठोकूया, चला कृषी विधेयकाला समर्थन देऊया’ अशी हाक दिली जाणार आहे. केंद्र आणि राज्याने विधेयके लागू करावीत, अशी मागणी करण्यात येणार आहे, असे सांगून खोत म्हणाले, की शेतकऱ्यांचा आक्रोश असलेल्या राज्यांमध्ये तांदूळ आणि गव्हाची खरेदी हमी भावाने होते. ती खरेदी ९० टक्के असते. त्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पैसे देते आणि राज्य सरकार हे पैसे बाजार समित्यांना देऊन त्यावर १३ टक्के बोनस देते. दुसऱ्या बाजूला शेतमाल खरेदी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून होते. त्यामुळे एकदा खरेदी केलेल्या मालाचा नोंद होऊन तो गुदामात जातो. पुढे त्यात गळती, नासाडीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे घोटाळे होतात. जसे महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांच्या भोवती राजकारण आहे, तसे त्या राज्यांमध्ये बाजार समित्यांभोवती राजकरण फिरत आहे. म्हणून हे लुटीचे अड्डे बंद पडले. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीच्या पर्यायी व्यवस्था निर्माण झाल्या, तर आम्ही लुटायचं कुणाला? हा खरा कळीचा मुद्दा असल्याने हा रोष आहे. 

विरोधकांकडून भीती घातली जातेय 

केंद्राने तीन विधेयके संमत केली असून, विरोधकांकडून भीती घातली जात आहे. यापूर्वी खरेदी-विक्रीचे व्यवहार ग्राह्य धरले जात नव्हते. आता ग्राह्य धरून त्यासाठी लवाद नेमला आहे. त्यामुळे बाजार समित्यांचेही अस्तित्व अबाधित राहणार आहे. बाजार समितीच्याबाहेर विक्री शक्य आहे. मात्र, एक दुकान किती वर्षे चालवायचे? शेतकऱ्यांचा जन्म बाजार समित्यांमधील व्यापारी बांडगुळ पोसण्यासाठी झाला आहे का? यापूर्वी ७० वर्षे शेतकरी का सक्षम झाला नाही? असे प्रश्‍न श्री. खोत यांनी उपस्थित केले. रयत क्रांती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, जिल्हाध्यक्ष वाल्मिक सांगळे, उपजिल्हाध्यक्ष डोंगर पगार, युवराज देवरे, अमोल गोरे उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com