एचएएलने परवानगी नाकारल्याने १० गावांची वाहतूक ठप्प; संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Hal denied permission to transport
Hal denied permission to transport

दिक्षी (नाशिक) : नाशिक ते कसबे सुकेणे मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शहर बस, साधी बस, तसेच कृषिमालाच्या वाहतुकीला वसाहतीमधून एचएएलने परवानगी नाकारल्याने सुमारे दहा गावांची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि प्रवासी संतप्त झाले असून, ज्या गावांनी भूमिहीन होऊन एचएएल कारखान्याला जमीन दिली त्याच गावांची एचएएलने आता कोंडी केल्याने संताप व्यक्त होत आहे. 

कोरोना संसर्गाचे कारण

ओझर येथील एचएएल कारखान्याने कसबे सुकेणेकडे जाणारा एएचएल हद्दीतील रस्ता बंद केल्याने कसबे सुकेणेसह सुमारे दहा गावांची वाहतुकीची कोंडी झाली आहे. गेल्या महिनाभरापासून ही नाकेबंदी झाल्याने नागरिक संतप्त असून, एचएएलने मरीमाता गेट ते मुंबई-आग्रा महामार्ग रस्ता अशी वाहतूक सुरू करावी, अशी मागणी सुकेणा ग्रामपंचायतीने केली होती; परंतु एचएएलच्या मानव संसाधन विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर अनिल वैद्य यांनी पुन्हा ग्रामपालिकेला पत्र देऊन कोरोना संसर्गाचे कारण देत परवानगी नाकारली आहे, त्यामुळे बाणगंगाकाठच्या गावांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एचएएलकडून गावांची होणारी कोंडी खासदार डॉ. भारती पवार, आमदार दिलीप बनकर यांनी लक्ष घालून तत्काळ सोडवावी, अन्यथा दहा गावांतील ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतकरी एचएएलच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन छेडतील, असा इशारा प्रवासी संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी व ग्रामपंचायतींनी दिला आहे. 


वाहतूक ठप्प; शेतमालाचे नुकसान 

ओझरकडून कसबे सुकेणेकडे जाणारी प्रवासी, अवजड वाहतूकही एचएएल स्थापनेपासून मुंबई-आग्रा महामार्गाच्या उजवीकडून ते मरीमाता गेट अशी व्हायची. महामार्गाच्या सहापदरीकरणानंतर हा रस्ता बंद करून कंपनीच्या मुख्य गेटसमोरून टाउनशिपमधून गेल्या काही वर्षांपासून सुकेणेकडील वाहतूक सुरू होती; परंतु गेल्या काही दिवसांपासून हा रस्ताही एचएएलने बंद केल्याने कसबे सुकेणेसह सुमारे दहा गावांतील कृषिमालाची वाहतूक ठप्प झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, तर ओझर शहरात अरुंद रस्त्यामुळे बस आणि अवजड वाहतूक होत नाही. हलक्या वाहनांची गर्दी ओझर शहरात होत असल्याने अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. एचएएल कारखाना उभारणी काळात कसबे सुकेणे, ओझर, दिक्षी, जिव्हाळे, थेरगाव या गावांतील शेतकऱ्यांच्या बागायती जमिनीचे संपादन रेल्वेमार्ग आणि टाउनशिपसाठी झाले होते. एचएएलने मात्र याच गावांचा रस्ता बंद करून कोंडी केल्यामुळे परिसरातून संताप व्यक्त होत आहे. 

एचएएलने दहा गावांचा रस्ता बंद करून गावांवर अन्याय करत आहे, बस बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. कृषिमाल बाजार समितीत नेता येत नाही याविषयी एचएएल प्रशासन, जिल्हाधिकारी व संबंधित गावचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक लवकरच घेऊन हा प्रश्न मार्गी लावू. 
-आमदार दिलीप बनकर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com