उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचे नियोजन करा - जयंत पाटील

Large projects to get water to North Maharashtra and Marathwada nashik marathi news
Large projects to get water to North Maharashtra and Marathwada nashik marathi news

नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचे शाश्वत, परिणामकारक नियोजन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील छोट्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या .आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या कामासंबंधातील मुलभूत बाबींची चर्चा करण्याच्या हेतुने आज जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला.

प्रकल्प तातडीने पुर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांच्या सर्वेक्षण व मान्यतांचा महिन्यातून एकदा आढावा मंत्रालय स्तरावर घेण्यात येतो. लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अर्थिक तरतूद करण्याबरोबरच शिल्लक कामांसाठी सामित्व मंजूर करणे तसेच नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील वळण बंधाऱ्यांच्या व लिफ्टच्या कामात शासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून तातडीने ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. गोदावरी खोऱ्यातील प्रकल्पांचे पाणी नाशिक, नगरसह जायकवाडीपर्यंत मुबलक तसेच सातत्यपूर्ण प्रवाहात राहण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जिथे शक्य आहे तिथे पाणी वळवण्यसाठीच्या शक्यता तपासून त्याप्रमाणे आखणी करण्यात येईल. तसेच लहान व पटकन पूर्ण होणारे प्रकल्प तात्काळ पूर्णत्वासाठी नेले जातील त्यासाठी निधीची तरतूदही केली जाईल. मोठ्या प्रकल्पांसाठी प्रसंगी कर्जही काढण्याचे नियोजन केले जाईल. आमदारांच्या मतदारसंघातील चाऱ्यांची कामे तसेच कॅनॉलच्या देखभाल व दुरूस्तीची कामे त्यांच्यासोबत बसून चर्चेतून अधिकाऱ्यांनी पूर्ण करावेत  त्यासाठी १० टक्के निधीची तरतूदही करण्यात आली असल्याचे सांगून पुढील काही दिवसात दिंडोरी व कळवण मतदार संघातील प्रकल्पांच्या कामासाठी प्रत्यक्ष प्रकल्पांना भेट देणार असल्याचेही जलसंपदा मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, नितीन पवार, सरोज आहेर, डॉ. राहुल आहेर, जलसंपदा विभागाचे सचिव एन.व्ही. शिंदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, अधिक्षक अभियंता अरुण नाईक, (अहमदनगर) अधीक्षक अभियंता आमले, (धुळे) ऊर्ध्व गोदावरी कार्यकारी अभियंता राहुल पाटील, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, नांदूर मध्यमेश्वर कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी आदी उपस्थित होते. 

पाण्याच्या गरजेप्रमाणे योजनांना प्राधान्य द्यावे : पालकमंत्री छगन भुजबळ

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची तहाण भागेल यासाठी प्राधान्य ठरवून प्रकल्पांची कामे हाती घेण्यात यावीत. सिन्नरला पिण्याच्या पाण्याचाच मुलभूत प्रश्न आहे, त्यासाठी नियोजित योजनांची कामे सहा महिन्यांच्या आत सुरू करण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्राच्या जमीनीवर पडणारे पाणी महाराष्ट्राला मिळाले पाहिजे त्याचा हक्क आम्ही सोडणार नाही अथवा लिहून देणार नाही. राज्याच्या हक्काचं पाणी राज्यातच रहायला हवे. आमदारांनी सुचवलेल्या छोट्या प्रकल्पांची कामेही तात्काळ पूर्णत्वास नेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.

या बैठकीत झालेल्या चर्चेत आमदार माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, नितीन पवार, सरोज आहेर, डॉ. राहुल आहेर यांनी सहभाग घेतला.

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com