चांदवड/दिंडोरी (जि.नाशिक) : नांदगाव येथे प्रवासी, पासधारक व यात्रेकरूंची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईकडे जाणाऱ्या किमान दोन ते तीन रेल्वेंना थांबा देण्यात यावा, मनमाड, नाशिक ते मुंबई प्रवास करणारे अनेक चाकरमाने आहेत. त्यांना वेळेवर दुसरी प्रवासाची साधने उपलब्ध होत नसल्याने त्यांची अडचण लक्षात घेता त्यांच्यासाठी गोदावरी एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्याकडे केली.
प्रवाशांना असंख्य अडचणी
कोरोना संक्रमण काळात रेल्वे सेवा सुरक्षितितेच्या कारणास्तव बाधित झाल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम हा सर्वच प्रवासी, अप्रवासी घटकांवर दिसून आला. आपत्कालीन सेवा वगळता रेल्वेच्या सर्वच सेवा बंद होत्या. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन फक्त कोव्हीड स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आल्या. त्यात त्यांच्या कोव्हीड-१९ च्या चाचण्या करून सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच प्रवासाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे ठराविक ठिकाणीच कोव्हीड स्पेशल रेल्वेचा थांबा असून, अनेक रेल्वे स्थानकांवर त्या थांबत नसल्याने प्रवास करणाऱ्या असंख्य नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी गोदावरी एक्स्प्रेस सुरु करण्याची मागणी खासदार पवार यांनी मित्तल यांच्याकडे केली. या बैठकीला विवेक गुप्ता, युवराज पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
भुयारी मार्गातील अडथळे दूर करावे...
नांदगाव, मनमाड, चांदवड, येवला येथील भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचून रहदारीचा मार्ग विस्कळित होतो. तेथे पाणी काढण्यासाठी कायमस्वरुपी सुविधा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मनमाड रेल्वे स्थानकाचेही आधुनिकीकरण व्हावे. स्थानकातील विकासकामांना गती मिळावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.