येवल्यात दोन दुकानांचे बियाणे विक्री परवाने निलंबित 

onion seed.jpg
onion seed.jpg

येवला (जि.नाशिक) : यंदा कांद्याच्या रोपांचे प्रचंड नुकसान झाल्याने बियाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. बियाणे विक्रेत्यांकडेही मुबलक प्रमाणात बियाणे मिळत नसल्याने आणि ते बियाणे वाढीव दराने विक्रीच्या तक्रारी होत आहे. यासंदर्भात कृषी विभागाला येथील शहरातील मुख्य दोन विक्रेते दोषी आढळल्याने त्यांच्यावर बियाणे विक्री परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

टंचाईत कांद्याच्या बियाण्याची अधिक दराने विक्री भोवली
शेतकरी कांदा लागवडीसाठी स्वतःच्या शेतातच बीजोत्पादन करून कांदा बियाणे वापरण्यास पसंती देतात. मात्र यावर्षी शेतकर्‍यांनी सुरुवातीला घरचे बियाणे टाकले मात्र हवामानाचा फटका बसून रोपे खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार,तिबारहि बियाणे टाकण्याची वेळ आली. परिणामी शेतकऱ्यांकडचे बियाणे संपल्याने गेल्या महिन्याभरापासून विविध कंपन्यांच्या बियाण्याला प्रचंड मागणी वाढली आहे. येथील विक्रेत्यांनी सर्वाधिक प्रमाणात शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून दिले आहे. पण काहींनी मात्र अधिक दराने विक्री केली तर काहींनी अनेक शेतकऱ्यांना बियाण्यांच्या विक्रीच्या पावत्या दिल्या नाही. त्या संदर्भात तक्रारी झाल्याने निफाड येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकाऱ्यांनी येथील नंदा सीड्स व महेश सीड्स यांच्या बियाणे विक्री केंद्राची तपासणी केली असता यामध्ये नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन आढळून आले तसेच या विक्रेत्यांनी उच्चतम विक्री किमतीपेक्षा अधिक वाढीव किमतीने बियाणे विक्री केल्याने त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

विक्रेत्यांचे धाबे दणाणले

परवाना निलंबित झाल्याच्या दिनांकापासून त्यांना सर्व प्रकारच्या बियाण्यांची खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून यासंदर्भातचे आदेश जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ यांनी आदेश काढले आहेत. या कारवाई प्रकरणी या दोन्ही विक्रेत्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी योग्य त्या पुराव्यानिशी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचनाही या आदेशात करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या कारवाईमुळे येथील खते- बियाणे विक्रीत गैरप्रकार करणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

“जिल्ह्यात सर्वाधिक बियाणे येवल्यात उपलब्ध करून शेतकऱ्यांची गरज भागविली आहे. शेतकऱ्यांना बियाणे विक्रीच्या पावत्याही दिले असून सर्व रेकॉर्ड व याद्या उपलब्ध आहे. काही तांत्रिक त्रुटींमुळे ही कारवाई झाली असावी. या संदर्भात पुराव्यांसह आम्ही वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहोत.” -दिनेश मुंदडा,संचालक नंदा सीड्स 

“सध्या नवीन टाकलेले बियाणे उगवणी नंतर ९० टक्केपर्यंत खराब होऊन जळून जाताय. अशात कांद्याचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्याने लागवडीसाठी बियाणे मागणी वाढली असून यामुळे बियाणे टंचाई निर्माण झाली आहे.काही ठराविक बियाणे विक्रेत्यांनी तर वाटेल तशी विक्री केली असून कृषी विभागाने इतक्या दिवसापूर्वीच कारवाई करायला हवी होती.”
-हरिभाऊ महाजन,अध्यक्ष,प्रहार शेतकरी संघटना 

“कांदा बियाण्यांच्या संदर्भात तपासणी करतांना दोष आढळल्याने कारवाई झाली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी तसेच बियाण्याची लॉट नंबरसह पावती घेतल्याशिवाय कुठलेही बियाणे खरेदी करू नये.” - कारभारी नवले,तालुका कृषी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com