तीन महिन्यांत काय काय करणार! शैक्षणिकदृष्ट्या मोक्याचा कालावधी संपला; विद्यार्थी, पालक, शिक्षकांपुढे टेन्शन

school students.jpg
school students.jpg

येवला (जि.नाशिक) : जून ते डिसेंबर हा शैक्षणिकदृष्ट्या मोक्याचा कालावधी संपला. आता उरलेत अवघे तीन ते चार महिने... या काळात ऑनलाइन झालेल्या अभ्यासक्रमाची उजळणी आणि राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासह परीक्षेची तयारी आणि अभ्यास या सर्व गोष्टी शिक्षक व विद्यार्थ्यांना करायला लागणार असल्याने शिक्षक व पालकांचे टेन्शन वाढले आहे. आता सरतेशेवटी चार महिन्यांत काय काय करणार, हा प्रश्न विद्यार्थी आणि शिक्षकांना सतावत आहे. 

तीन महिन्यांत काय काय करणार 
जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपासून सुरू होणार असून, शाळांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे. तर शिक्षण विभागाने दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेचे अर्ज भरणे सुरू केले आहे. यामुळे काहीशा उशिरा म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या दोन्ही महत्त्वाच्या वर्षाच्या परीक्षा होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कोरोना संसर्गामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात आलेले अडसर व अडथळ्यावर मात करून हे आव्हान शिक्षण विभाग पेलवणार आहे. राज्यात २३ नोव्हेंबरपसून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून, पाच लाखांहून अधिक विद्यार्थी उपस्थित राहत असले तरी जिल्ह्याचा निर्णय लांबणीवर पडल्याने अद्याप शाळांना कुलूपच आहे. 

ही कामे करावीच लागणार... 
४ जानेवारीनंतर शाळा सुरू झाल्यावर आतापर्यंत ऑनलाइन अध्यापन झाल्याने शिक्षकांना त्याची उजळणी करावी लागणार असून, राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनाही अभ्यासक्रम समजून घ्यावा लागेल. याच काळात राहिलेल्या सराव परीक्षा, नियमित प्रात्यक्षिके, बोर्डाचे प्रात्यक्षिके, बोर्डाच्या लेखी व तोंडी परीक्षा, जर्नल्स, टीटोरियल ही सर्व कामे पूर्ण करावी लागतील. सोबतच विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करावा लागणार आहे आणि शिक्षकांना या सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. त्यामुळे येणाऱ्या तीन-चार महिन्यांच्या कालावधीत शिक्षक विद्यार्थ्यांना मोठी जबाबदारी घेऊन हे शिवधनुष्य पेलवावे लागणार आहे, हे नक्की! याचमुळे उर्वरित कालावधी कमी असल्याने व अभ्यासक्रमाचा विस्तार लक्षात घेता शासनाने अभ्यासक्रमांत ५० टक्के कपात करावी, अशी अपेक्षाही पालक, शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. 

दहावी-बारावी परीक्षा एप्रिल- मेमध्ये घेण्याचे शिक्षण मंडळाने जाहीर केले, पण विद्यार्थी तयारीसाठी वेळ फार कमी आहे. शिक्षक सुटीच्या दिवशीही तास घेऊन अध्ययन-अध्यापन करून अभ्यासक्रम पूर्ण करतील; पण उरलेला कालावधी पाहता तणाव व अभ्यास करण्यासाठी कालावधी मिळावा म्हणून शिक्षण विभागाने अजून कपात करून फक्त ५० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घ्याव्यात म्हणजे सर्वच तणावमुक्त राहतील. -एस. बी. देशमुख, सचिव, राज्य मुख्याध्यापक संघ 

विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यासाठी मूल्यमापन कसे करणार, असा पालक आणि शिक्षकांच्या मनात प्रश्न आहे. जेथे शाळा सुरू झाल्या तेथे विद्यार्थ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांहून अधिक असून, चालू शैक्षणिक वर्ष काही महिन्यांमध्येच संपणार आहे. त्यामुळे मुलांना पुढच्या वर्गात पाठवण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा. तसेच दहावी-बारावीच्या परीक्षा तणावमुक्त होतील, यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. -गणेश डोंगरे, शिक्षक नेते, येवला 

शाळा सुरू झाल्यावर अनेक शैक्षणिक कामे विद्यार्थी-शिक्षकांना पूर्ण करावी लागणार आहेत. त्यातच कोरोनाची भीती असल्याने होणारी गर्दी व धोके टाळण्यासाठी शासनाने ठोस मार्गदर्शन करावे. परीक्षा घ्याव्या लागणारच आहेत; मात्र अभ्यासक्रम कमी करून परीक्षेचे या वर्षापुरते स्वरूपही शिक्षण विभागाने बदलावे म्हणजे विद्यार्थ्यांवर खूप तणाव येणार नाही. -प्रा. एम. पी. गायकवाड, अध्यक्ष, जुक्टो, येवला 

 

दहावीचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक 
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : www. Mahahsscborad.in 
नियमित विद्यार्थ्यांसाठी - २३ डिसेंबर ते ११ जानेवारी 
खासगी विद्यार्थी आणि पुनर्परीक्षार्थी - १२ ते २५ जानेवारी 
* बारावीचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक 
शास्त्र, कला व वाणिज्य शाखांच्या फक्त नियमित विद्यार्थ्यांसाठी 
सरलवरून ऑनलाइन : १५ डिसेंबर ते ४ जानेवारी 
व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे 
नियमित विद्यार्थ्यांसह इतर : ५ ते १८ जानेवारी  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com