बाजारभावाच्या वाद्याने शेतकऱ्यांना कांद्यातून ३२० कोटीला चुना 

बाजारभावाच्या वाद्याने शेतकऱ्यांना कांद्यातून ३२० कोटीला चुना 

येवला - इतर पिकांना बाय-बाय करून सर्वाधिक क्षेत्र कांद्याखाली आणलेल्या येथील शेतकऱ्यांना यंदा कांद्याने वांदा करत मोठा झटका दिला आहे. मागील वर्षाचा (२०१८) विचार करता यंदा (२०१९) तब्बल ३२० कोटी रूपयांचा चूना येथील शेतकऱ्यांना घसरलेल्या बाजारभावामुळे लागल्याचे मार्चअखेरीसचे आकडे सांगतात. परिणामी दुष्काळात ३२ लाख क़्विटल कांदा पिकवूनही मेहनत मातीत गेल्याचे हे आकडे सांगतात.

लासलगाव,पिंपळगाव बसवंत पाठोपाठ आता येवल्याच्या बाजार समितीने कांद्याच्या बाबतीत नावलौकिक मिळविला आहे.कारण अनेकदा कांद्याने वांदा केला पण एखादं वर्ष असेही आले की त्याच कांद्याने शेतकर्यांाना लखपती केल्याचीही उदाहरणे आहेत.याचमुळे २०१८ मध्ये कांद्याला वर्षभर विक्रमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा दुष्काळ असताना देखील प्रतिकूल परिस्थितीत विक्रमी कांदा लागवड केली होती.मात्र या वर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यातही लागवड वाढून आवक वाढल्याने कांद्याला सरासरी फक्त ५०० रुपये भाव मिळाला.अनेक शेतकऱ्यांनी तर चाळीतला उन्हाळ कांदा फेकूनही दिला.

२०१५ नंतर २०१८ च पावले..
दुष्काळ असल्याने एप्रिल १५ ते मार्च १६ मध्ये लागवड घटली.तालुक्यात २० लाख १२ हजार क़्विटल कांदा विक्रीतून शेतकर्यांच्या हातात २४० कोटी रुपये मिळाले होते.भावात चढउतार होऊनही सरासरी एक हजार १५० रुपयांचा भाव तेव्हा मिळाला होता. मात्र २०१६-१७ दरम्यान लागवड वाढल्याने ३० लाख ७१ हजार क़्विटल कांदा विक्री झाला. वर्षभरात या कांद्याला २०० ते १ हजार १६२ रुपये तर सरासरी फक्त ६०० रुपये भाव मिळाल्याने १८४ कोटी २७ लाख शेतकर्यांच्या हातात पडून १५-१६ च्या तुलनेत १२२ कोटीचा तोटा सहन करण्याची वेळ आली होती. पुढे एप्रिल १७ ते मार्च १८ दरम्यान कांद्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीची सगळीच कसर काढून दिली. कारण वर्षभर ३०० ते ४ हजार ६७५ पर्यत भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना विक्रमी ४८१ कोटी रुपयांचे उत्पन्न हातात पडले.यामुळे अनेकांना मोठा आर्थिक आधार मिळत नुकसानीची तुट भरून काढता आली. 

यंदा तर निव्वळ लुटमार..
यावर्षी मात्र दुष्काळात शेतकऱ्यांनी नाना प्रयत्न करून कांदे पिकवले.पण जेव्हा विक्रीला आणले तेव्हा भावाने दगा दिला.शेतकरी रस्त्यावर उतरले,आंदोलने झाले पण हाती धुपाटणे आल्याची वेळ आली.येवला व अंदरसूल उपबाजारात शेतकऱ्यांनी वर्षात ३२ लाख क़्विटल कांदे विक्री केले पण भाव ५० ते १ हजार ५०० च्या दरम्यानच मिळाल्याने शेतकर्यांच्या हातात अवघे १६१ कोटी मिळाले. म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत शेतकऱ्यांचे ३२० कोटीचे नुकसान झाले ते केवळ शासनाच्या धोरणाने कोसळलेल्या भावामुळे.   

२५ हजार हेक्टरवर लागवड..!
दुष्काळी व अवर्षणप्रवण तालुका असला तरी शेतकरी मात्र कांदा प्रिय आहे.तालुक्यात खरीपातील पोळ तर रब्बीतील रांगडा कांद्याची दोन्ही हंगामात सुमारे १५ हजार हेक्टरपर्यत तर पाणीटंचाईमुळे उन्हाळ कांदा नऊ हजार हेक्टरपर्यत लागवड केली जाते.विशेष म्हणजे भाव वाढले कि पुढील वर्षी लाल-पोळ व पाठोपाठ रांगड्या कांद्याचे क्षेत्र विक्रमी वाढते.

“भाव १५०० पर्यत स्थिर राहिले तर शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही.मात्र यंदा खूपच भाव पडल्याने बाजार समितित कांदयाची आवक वाढली परंतू शेतकऱ्यांसह मार्केट कमिटीचेही आर्थिक नुकसान झालेले आहे.आता शासन मदत देत आहे पण त्याला निकष लावलेत.कांदा अनुदानाच्या २०० क्विंटलच्या मर्यादेत वाढ अपेक्षित होती.
-सौ. उषाताई शिंदे,सभापती : कृषी उत्पन्न बाजार समिती,येवला

वर्ष         -     आवक क़्विटल   - सरासरी बाजारभाव   -   एकूण विक्री मुल्य
२०१५-१६    -२० लाख १२ हजार      -१२००                          २४० कोटी
२०१६-१७    -३० लाख ७१ हजार      -६००                           १८४ कोटी
२०१७-१८    -३४ लाख ४१ हजार      -१४००                         ४८२ कोटी
२०१८-१९    -३२ लाख ३६ हजार      -५००                           १६१ कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com