नाशिक - केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राज्यातील आदिवासींपर्यंत पोचवण्यासाठी भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चातर्फे रविवारपासून जनजाती गौरव यात्रेची सुरवात झाली. ही यात्रा राज्यातील पाच हजार गावांत जाणार असून, स्थानिक बोलीभाषेतील चित्रफितीद्वारे संवाद साधण्यात येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, संघटनमंत्री विजय पुराणिक आणि आमदार-खासदारांच्या उपस्थितीत नांदुरी येथे यात्रेचा प्रारंभ झाला. मुख्यमंत्री म्हणाले, की जनजाती समाजाने राष्ट्र निर्माणासाठी योगदान दिले. भगवान बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, बाबूराव शेडमाके, भाऊसाहेब भांगरे यांचा देशाच्या स्वातंत्र्यात सहभाग राहिला. त्यांचे योगदान यात्रेच्या माध्यमातून घरोघरी पोचवण्यात येईल. भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हरिश्चंद्र भोये यांनी ही यात्रा प्रत्येक वाडी-वस्ती आणि पाड्यापर्यंत नेण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्यातील 26 जिल्ह्यांतील 20 लाख लोकांपर्यंत ही यात्रा पोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.
|