जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारांचे आरोप झालेल्या राज्यातील मंत्र्यांना "क्लीन चिट' देण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यांनी जेवढ्या मंत्र्यांना क्लीन चिट दिली आहे, त्या सर्वांची न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे (सप) प्रदेशाध्यक्ष, आमदार अबू आझमी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप करीत असून, देशाची घटना बदलण्याच्या तयारीत ते असल्याचा आरोपही आमदार आझमी यांनी या वेळी केला.
'एमआयएम' द्वेष पसरविते
"एमआयएम' हा पक्ष केवळ मुस्लिमांसाठी काम करतो. भाषणांतून द्वेष पसरविण्याचे काम केले जाते; तर "सप' ही हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई बांधवांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. "राष्ट्रवादी', जनता दल इतर पक्षांसोबत येऊन भाजप, कॉंग्रेसला मोठा विरोधक निर्माण करण्याची ताकद आगामी काळात समाजवादी पक्ष निर्माण करेल, असा विश्वासही आझमी यांनी व्यक्त केला.
भारतात लोकशाही असताना सत्ताधारी धर्माच्या नावावर न्याय करत आहेत. मोदी सरकारचा न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप वाढला आहे. अनेक कायदे, नियम त्यांच्याबाजूने केले जात आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना बदलविण्याच्या तयारीत आहेत. याचा मोठा धोका भारताला आहे.
देशभरात कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. महिला, मुलींवर अत्याचार, खुनाच्या घटना घडताहेत. देशाचा विकास ठप्प झालेला आहे.
धर्माच्या नावावर मतदान होऊ नये यासाठी सांप्रदायिकता नाहीशी झाली पाहिजे, असे आझमी म्हणाले.
महापालिका निवडणूक लढणार
समाजवादी पक्षातर्फे जळगाव महापालिका निवडणुकीत पन्नास उमेदवार उभे केले जातील. ज्यांना आमच्यासोबत युती करायची आहे, ते सोबत येऊ शकतील. मात्र, आम्ही सांगू त्या अटीवर युती होईल. नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले पाहिजे. समांतर रस्ते झाले पाहिजे, शहराचा विकास झाला पाहिजे, आदी मुद्द्यांवर महापालिका निवडणूक लढवू.
|