एक खड्डा पडला नव्वद हजारांत...

chalisgav - dhule road.jpg
chalisgav - dhule road.jpg

चाळीसगाव :चाळीसगाव- धुळे रस्ता सध्या खड्डेमय झाला आहे. काल रात्री आठच्या सुमारास अमळनेर येथील राजेंद्र पाटील हे आपल्या पत्नीसह दहिवद येथील नातेवाइकांना भेटण्यासाठी जात होते. रस्त्यावरील वर्षा हॉटेलच्या वळणावर त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळल्याने राजेंद्र पाटील पडले. त्यांच्या पायाला व डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांनी मेहुणबारे येथील डॉ. स्वप्निल देवकर यांच्याकडे उपचार घेतले. दुसरी घटना खडकीसीम फाटा ते जामदा फाटा दरम्यान घडली. औरंगाबाद येथील दाम्पत्याची दुचाकी खड्ड्यात पडल्याने पती- पत्नी जखमी झाले. अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने दवाखान्यात शस्त्रक्रियेसह इतर उपचारासाठी त्यांना ९० हजार रुपये भरावे लागले.

स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष का देत नाही?

इतके भीषण खड्डे पडलेले असताना स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष का देत नाही? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. केवळ खड्ड्यांमुळे दररोज तीन ते चार जण जखमी होत आहेत. या सर्व घटना ताज्या असताना आज पुन्हा औरंगाबाद येथून दुचाकीने (क्रमांक- एम. एच. १२ जेबी ४७६७) शहादा येथे शालकाच्या अंत्यविधीसाठी जाणारे दाम्पत्य मेहुणबारे येथील गिरणा विद्यालयापासून थोड्याच अंतरावर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडले. यात सतीश पवार हे जखमी झाले. सुदैवाने त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली नाही.

चाळीसगाव- धुळे रस्त्यावर अपघातांची श्रृंखला सुरुच
या रस्त्यावरील गिरणा नदीच्या पुलावरच मोठमोठे खड्डे पडले आहेत. २७ सप्टेंबरला औरंगाबाद येथून कुबेर भंडारला जाण्यासाठी निघालेले उद्धवराव जाधव (रा. वारेगाव, जि. औरंगाबाद) हे आपल्या अल्टो गाडीने (क्रमांक- एम. एच. २०, डीजी ५८०३) जात होते. रात्री बाराच्या सुमारास त्यांची गाडी पुलावरील खड्ड्यात आदळली. ज्यामुळे गाडीचा पाटा तुटून काचाही फुटल्या व गाडी बंद पडली. ती दुरुस्त करण्यासाठी त्यांना मोठा खर्च आला. या पुलावरील धोकादायक खड्डे पोलिसांनी बुजवले असले तरी असे जीवघेणे खड्डे अजूनही इतर विविध ठिकाणी ‘जैसे थे’आहेत.

विंचूर पूल कमकुवत

अगोदरच रस्त्याची वाट लागलेली असताना चाळीसगाव- धुळे चौफुलीजवळील विंचुर नदीवरील पुलाची तर अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या पुलाच्या दोन्ही बाजू कमकुवत झाल्या आहेत. हा पूल सध्या वापरण्यायोग्य राहिला नसल्याने या पुलावरून चालताना भीती वाटते. पुलावर पडलेल्या खड्ड्यांची मध्यंतरी थातूरमातूर डागडुजी केली होती. या पुलावरुन दररोज हजाराच्यावर वाहनांची ये- जा असते. औरंगाबादकडून धुळे, सुरत किंवा इंदोरकडे जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे. त्यात अवजड वाहनांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. त्यामुळे या पुलाची डागडुजी करणे गरजेचे झाले आले.

मणक्याचे विकार जडले

चाळीसगाव- धुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने वाहन चालविताना कुठून चालवावे, असा प्रश्‍न पडलेला असतो. आकाशातील ताऱ्यांप्रमाणे मोजता येणार नाहीत, असे अगणित खड्डे पडल्याने संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. वाहनधारकांना अक्षरशः कसरत करून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यामुळे अनेकांना मणक्याचे विकार जडले आहेत. बऱ्याच दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान होत आहे. या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन सद्यःस्थितीत किमान खड्डे तरी बुजावेत, अशी आर्त मागणी नागरिकांमधून होत आहे

रस्त्याने नऊ महिन्यात घेतले बारा बळी

अत्यंत रहदारीच्या असलेला महामार्ग क्रमांक २११ वरील चाळीसगाव ते धुळे पर्यंतच्या रस्त्याची दोनच वर्षांत वाट लागली आहे. या रस्त्यावरील दहिवद फाटा ते चाळीसगावपर्यंत २२ किलोमीटरच्या अंतरावर लहान मोठे तब्बल ५८० खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची रुंदी एक मीटरपेक्षा जास्त तरवाडे बारी ते जिजाई गार्डन हॉटेलपर्यंत जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात बारा जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मेहुणबारे पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com