ग्रामीण भागातून 'आखाजी' होतेय हद्दपार

ग्रामीण भागातून 'आखाजी' होतेय हद्दपार

पिलखोड (ता. चाळीसगाव) : खानदेशातील महत्वपूर्ण असलेला अक्षयतृतीया अर्थात 'आखाजी' सण शहरी भागात पूर्वीसारखा साजरा होताना दिसत नाही. या सणाचे ग्रामीण भागात असलेले महत्वही विविध कारणांमुळे कमी होताना दिसत आहे. केवळ एकाच दिवसापूरता 'आखाजी' साजरा केली जात असल्याने ग्रामीण भागातूनही तो हद्दपार होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

 स्मार्टफोनमुळे ग्रामीण जीवन आधुनिक व सुकर झाले आहे. अक्षयतृतीय अर्थात 'आखाजी' हा खानदेशातला मोठा सण मानला जातो. पंचक्रोशीतील गावांमध्ये या सणाचे गांभीर्य काही वर्षांपासून कमी होत असून दरवर्षी ते प्रकर्षाने जाणवत आहे. सध्या परिसरात कांदा काढणीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांसह महिला व पुरुष मजूर दिवसभर शेतातच राबत आहेत. त्यामुळे गावे ओस पडली आहेत. नुकत्याच शाळेला सुट्ट्या लागल्याने मुले-मुलीही शेताची वाट धरत आहेत.  त्यात उन्हाचा पारा वाढल्याने गावागावातील चौकात शुकशुकाट आहे. एका दिवसावर आलेल्या आखाजी सणाचे महत्व ग्रामस्थांमध्ये पूर्वीसारखे दिसत नसून त्या दिवसापूरताच सण साजरा करणे, हा नवा 'शहरी ट्रेंड' ग्रामीण भागात रुजलेला पाहावयास मिळत आहे.

झाडे नसल्याने 'झोके'च गायब...
झाडे लावण्यासाठी व त्यांच्या संवर्धनासाठी शासन त्यांच्यापरीने प्रयत्न करीत आहे. परंतु काही वर्षांपासून चौकातली झाडेही हळूहळू नामशेष झाली आहेत. आखाजी म्हटल्यावर माहेरवाशिणी आपल्या गावी आल्यानंतर झोके खेळतात. आता गावात झाडेच नसल्याने 'आखाजी'चा झोका कुठे बांधायचा हाही प्रश्न उद्भवत आहे. शेतात बांधलेल्या दोन चार झोक्यांखेरीज गावात सद्यस्थितीत कुठेच झोके दिसून येत नाही.


मोबाईलमुळे मुले व्यस्त...
घराघरात अँड्रॉईड मोबाईल आल्यामुळे झोके खेळणारी मुले, मुली मोबाईलमध्ये व्यस्त दिसतात. विविध मोबाईल कंपन्यांची इंटरनेट सेवा ग्रामीण भागात पोहोचल्यामुळे मुला-मुलींसह महिलांनाही मोबाईलवरील विविध 'गेम'ने वेड लावले आहे. त्यामुळे आखाजीच्या निमित्ताने गावातील गल्ल्यांमध्ये विशेषतः तरुणी व महिलांची रेलचेल दिसणे दुरापास्त झाले आहे.

आंब्याचा गोडवाही महागला...
आखाजीच्या गोडधोड जेवणात आंब्याचे महत्व वेगळे असते. यंदा वातावरणातील बदल व अवकाळी पावसामुळे आंब्यांचा मोहोर गळाल्याने फळधारणेला उशीर झाला. त्यामुळे गुजरातसह इतर राज्यांमधून आंबा महाराष्ट्रात दाखल झाला आहे. सध्या आंब्याची कमीतकमी 120 रुपये किलोपासून विक्री सुरू आहे. मागील वर्षी 80 रुपये किलोप्रमाणे मिळणारा आंबा यंदा महागल्याने सर्वसामान्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. बाजारात आंबा उपलब्ध नसल्याने दर वधारल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com