नाशिक - आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांतील शिक्षकांच्या बदल्या आता जिल्हा परिषदेप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने करण्याचे सूतोवाच आदिवासी आयुक्त राजीव जाधव यांनी केले. राज्यातील आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेतर्फे झालेल्या धरणे आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला.
आश्रमशाळांमध्ये शिक्षकांचा सहा वर्षांचा कालावधी एकाच शाळेत पूर्ण केल्यानंतर तो शिक्षक बदलीसाठी पात्र ठरतो. त्यानंतर प्रकल्प
कार्यालयामार्फत राज्यातील सर्व शिक्षकांचे बदलीसाठी अर्ज मागून त्यांची सर्व माहिती संकलित करून त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची बदली केली जात होती; मात्र ही पारंपरिक पद्धत दरवर्षी राबवताना यात अनेकदा त्रुटी राहतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना गैरसोयीच्या बदल्यांना सामोरे जावे लागते. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारही होतात. स्थलांतर करताना शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
त्यामुळे जिल्हा परिषदेप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याची मागणी शिक्षकांमधून होत होती. दोन वर्षांपासून नागपूर प्रकल्प कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने बदली समुपदेशन केले जात होते; मात्र इतर ठाणे, अमरावती आणि नाशिक प्रकल्प विभागात जुन्या पद्धतीनेच शिक्षकांच्या बदल्या होत असल्याने 31 मार्चला आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेतर्फे नागपूर पद्धतीने इतर प्रकल्प कार्यालयांत ऑनलाइन बदली करण्याची मागणी करताच आदिवासी आयुक्त जाधव यांनी इतर विभागातदेखील नागपूर पॅटर्नप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या आणि समुपदेशन करण्याचे सूतोवाच केले.
|