रमजानच्या पार्श्वभूमीवर मागणीत वाढ; फरकासह १,३९० रुपये क्विंटल भाव जाहीर
रावेर (जि. जळगाव) - सध्या सुरू असलेला रमजान महिना आणि त्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट केळी मालाच्या मागणीत झालेली मोठी वाढ यामुळे उद्या (ता. २०) रोजी केळीसाठी फरकासह १,३९० रुपये क्विंटल भाव जाहीर झाले आहेत. गेल्या वर्षभरातील हा सर्वाधिक विक्रमी भाव मानला जातो. यापुढील काळातही असेच विक्रमी भाव राहतील अशी बाजारपेठेची स्थिती आहे.
येथील बाजार समितीतर्फे उद्या (ता. २० मे) साठी १२७० रुपये क्विंटल फरक २० रुपये असे एकूण १३९० रुपये क्विंटल भाव जाहीर झाले आहेत. यापूर्वी १२ मे रोजी केळीला फरकासह १३८२ रुपये भाव मिळाला होता. उद्या केळीला मिळणारा भाव हा मागील वर्षभरातील सर्वांत जास्त भाव आहे. बाजारपेठेत अन्य फळांचे भाव खूपच जास्त आहेत. आंबा ६० ते ७० रुपये किलो, हापूस आंबा ४०० ते ७०० रुपये डझन, चिकू ४० ते ५० रुपये किलो, सफरचंद व अन्य फळे शंभर रुपये किलोपेक्षा जास्त भाव आहेत. या पार्श्वभूमीवर केळीची मागणी वाढल्याने केळीचे भाव सध्या तेजीत आहेत. आगामी काळातही दर्जेदार केळीचा पुरवठा मर्यादित आणि जेमतेम राहणार असल्यामुळे केळीचे भाव असेच तेजीत राहतील व सध्याच्या भावापेक्षाही जादा भाव केळीला मिळू शकतो अशी परिस्थिती आहे. याबाबत बाजार समितीच्या केळी भाव निश्चयन समितीचे प्रमुख रामदास पाटील म्हणाले, की केळीला विक्रमी भाव दिसत असले तरी अन्य फळांच्या तुलनेत ते खूपच कमी आहेत. वाढलेले उष्णतामान, जमिनीखालील पाण्याची घसरलेली पातळी, वादळ आणि अन्य नैसर्गिक आपत्तींचा विचार करता केळीला सुमारे दोन हजार रुपये क्विंटल इतका किमान भाव मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.