सटाण्यात बोलेरो व रिक्षाचा अपघात ; एक ठार आठ गंभीर जखमी

सटाण्यात बोलेरो व रिक्षाचा अपघात ; एक ठार आठ गंभीर जखमी

सटाणा - शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर विंचूर - प्रकाशा महामार्गावरील चिनार विश्रामगृहालगत आज सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो वाहनाने एपे रिक्षाला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात रिक्षातील एक प्रवासी जागीच ठार झाला, तर चालकासह अन्य ८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. अपघातात रिक्षाचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. अपघातानंतर फरार झालेल्या बोलेरो चालकाचा सटाणा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, या अपघातामुळे अवैध प्रवासी वाहतूक आणि अॅपेवाल्यांचा धुमाकूळ हे दोन्ही मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत.

आज दुपारी अंतापूर (ता.बागलाण) येथून घरगुती कार्यक्रम आटोपून एपे रिक्षा (क्र. एम. एच. ४१ सी २४३६) चा चालक मोहन संजय खैरनार (वय २७) हा प्रवाशांना घेऊन लोहोणेर (ता.देवळा) कडे निघाला होता. सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास एपे रिक्षा विंचूर - प्रकाशा महामार्गावरील चिनार विश्रामगृहालगत येताच देवळ्याकडून सटाण्याच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या बोलेरो वाहना (क्र. एम. एच. ४१ व्ही. ७३६१) ने एस.टी. बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र भरधाव वेगात असलेल्या बोलेरो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्याने समोरून येणाऱ्या एपे रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एपे रिक्षाचा चेंदामेंदा होऊन महामार्गाच्या कडेला जाऊन पडली. अपघातामुळे रिक्षातील विष्णू किसन माळी (४०, रा. लोहोणेर, ता.देवळा) हा जागीच ठार झाला. तर बकुबाई वसंत जाधव (वय ४६), हुसन विठ्ठल पवार (वय ३०), गीताबाई फुला जाधव (वय ६०), चंद्रकला रमेश जाधव (वय ४४), मोहन संजय खैरनार (वय २७, चालक), जयाबाई अनिल पवार (वय २७), अकुबाई रामदास वाघ (वय ६०), रामदास सखाराम वाघ हे गंभीर जखमी झाले. 

चिनार विश्रामगृहावर असलेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना घटना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी सर्व जखमींना तातडीने सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजाराम सैन्द्रे, डॉ. शशिकांत कापडणीस व डॉ. मयुरी महाले यांनी जखमींवर तातडीने उपचार केले. यानंतर पुढील उपचारांसाठी सर्व जखमींना मालेगाव येथे हलविण्यात आले. 

दरम्यान, बागलाण तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूकीमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून भरलेले असतात. एकेका रिक्षात दहापेक्षा अधिक तर, टॅक्सी किंवा अॅचपेरिक्षात हीच संख्या १५ ते २० दरम्यान गेलेली दिसते. वाहनाच्या मागे, टपावर तसेच पुढील भागावरही प्रवासी बसविलेले असतात. ही धोकादायक वाहतूक पोलिसांच्या देखत होत असतानाही त्यांच्याविरूध्द कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com