बोंडअळीनंतरही कल कपाशीकडेच!

Cotton
Cotton

जळगाव - जिल्ह्यात गेल्या वर्षी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असला तरी शेतकऱ्यांचा कल यंदाही कपाशीकडेच अधिक राहील. पाच ते दहा टक्के कपाशीचे क्षेत्र कमी होईल. कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांकडे वळावे, यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

खानदेशातील कापूस अव्वल दर्जाचा आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी त्याकडे पाहतात. दुसरे नगदी पीक जिल्ह्यात नाही. यामुळे शेतकऱ्यांना कपाशी शिवाय पर्याय नाही. गुलाबी बोंडअळीने जिल्ह्यातील सव्वाचार लाख हेक्‍टरवरील कपाशीचे नुकसान झाले. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले. मात्र नुकत्याच मिळालेल्या कर्जमाफीने त्यांना दिलासा मिळाला. 

जूनपासून खरीप हंगाम सुरू होतो. शेतकरी सध्या शेतात नांगरणीची कामे करून शेतातील काडीकचरा जाळून शेत स्वच्छ करताना दिसतात. काही शेतकरी बागायती करतात. मात्र, अजून बियाणे उपलब्ध झालेले नसल्याने शेतकरी कोणती पिके घ्यावीत, यावर आपसांत, मित्र, नातेवाईक यांच्याकडून सल्ला घेताना दिसतात. 

कितीही झाले तरी नगदी पीक म्हणून कपाशी आहे. यामुळे कपाशी पेरावीच, त्याचे क्षेत्र मात्र कमी करावे, असे सांगितले जाते. तूर, सोयाबीन, ऊस, मका पेरण्याबाबत विचार शेतकरी करीत आहे.

कडधान्य घेण्याबाबत मार्गदर्शन
कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कपाशी न पेरता कडधान्याकडे वळावे, असे शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरवात केली आहे. त्याबाबत शेतकरी परिसंवाद घेऊन कडधान्याची पेरणी केल्याचे फायदेही समजावून सांगितले जात आहेत. कडधान्य आरोग्याला पोषक असते. शरीराची प्रोटीनचे गरज भागविते. जमिनीची सुपीकता वाढता, जमिनीत जिवाणूंची संख्या वाढते आदी मार्गदर्शन केले जात आहे.

कडधान्याकडे न वळण्याची कारणे
 कडधान्यात जेव्हा काढणीस येतात तेव्हा पाऊस पडतो
 काढणीस मनुष्यबळ लवकर मिळत नाही
 पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसांचे पीक आहे
 हमीभाव मिळत नाही
 जेव्हा जास्त पीक येते तेव्हा भाव कमी केले जातात.

हे केले तर कडधान्याकडे वाढेल कल
 शेतकऱ्यांना मोफत किंवा अनुदानावर कडधान्याचे बियाणे देणे
 ११० ते १२० दिवसांत येणारे वाण तयार करणे
 विद्यापीठास अशा वाणाचे संशोधनास सांगणे
 उत्पादन खर्चापेक्षा अधिक हमीभाव द्यावा
 मनुष्य बळाची योग्यवेळी उपलब्धता करून देणे

जिल्ह्यात कपाशी हे नगदी पीक आहे. यामुळे बोंडअळी आली तर पाच ते दहा टक्के क्षेत्र कमी होऊ शकते. कडधान्याकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. मात्र शेतकऱ्यांचे शेतीबाबतचे गणित वेगळे असते. कडधान्य जेव्हा हातात येण्याची वेळ असते तेव्हा पाऊस पडतो. शेतकऱ्यांचे नुकसान होते. यामुळे कपाशी कडे कल कायम राहील.
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com