केमिकल कंपनीच्या आगीत कोट्यवधींची हानी

कंपनीजवळील गटारातून बाहेर येणाऱ्या केमिकलने घेतलेला पेट.
कंपनीजवळील गटारातून बाहेर येणाऱ्या केमिकलने घेतलेला पेट.

जळगाव - औद्योगिक वसाहत परिसरातील जी-सेक्‍टर येथील रवी इंडस्ट्रीज कंपनी आज सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. कंपनीतील केमिकल रिॲक्‍टरचा स्फोट होण्यापूर्वी आतील आठ- दहा कामगारांनी पळ काढून स्वत:चा जीव वाचविला.

औद्योगिक वसाहतीत रवी इंडस्ट्रीज (जी-सेक्‍टर ४५) ही रवींद्र पाटील यांच्या मालकीची असून, सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीचे लोळ आकाशात उंचावर दिसू लागल्याने दुर्घटना घडल्याचे इतर कंपनीचालकांना कळाल्याने मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. 

पेटत्या गटारी 
रवी इंडस्ट्रीजमधील केमिकल्सने पेट घेऊन हजारो लिटर पेटते केमिकल कंपनीच्या बाहेर गटारीत उतरल्याने गटारींनी पेट घेतला होता. जवळ पास एक ते दीड किलोमीटरपर्यंत पेटणाऱ्या गटारांमुळे इतर कंपन्या पेटू नये म्हणून पाण्याचा मारा करण्याचा प्रयत्न केल्यावर आगीचे लोट वाढत होते. परिणामी, फोम मागवण्यात येऊन त्याच्याने गटारींची आग नियंत्रणात आणण्यात आली. 

यांची झाली मदत
महापालिकेचा एक बंब पोचला. मात्र, आग पाण्यामुळे आग वाढत असल्याने नंतर जैन उद्योग समूहाचे तीन अग्निबंब कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मेरिको इंडस्ट्रीजचे गिरीश शिंदे, आय. जी. शेख, आर. एस. पाटील १५० लिटर फोम घेऊन पोचले. घटनेची माहिती कळाल्यावर निरीक्षक रणजित शिरसाठ, उपनिरीक्षक राजकुमार ससाणे, वाठोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, विजय पाटील यांच्यासह इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्यात सहभागी झाले होते, गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना खूप परिश्रम करावे लागले.

अनधिकृत ‘गीतांजली’च सुरू होती 
औद्योगिक वसाहत परिसरातील गीतांजली केमिकल्स या कंपनीत ७ जानेवारी २०१८ रोजी केमिकल रिॲक्‍टरचा स्फोट होऊन आत काम करणाऱ्या बारा कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढवला होता. तेव्हापासून गीतांजली केमिकल्स ही कंपनी बंदावस्थेत आहे. कंपनी बंद झाल्याने या कंपनीतील यंत्रसामग्री जी-४५ येथील रवी इंडस्ट्रीज येथे स्थलांतरित करून अनधिकृतपणे केमिकल प्लान्ट चालवला जात असल्याचा आरोप प्रवीण बेहडे यांनी घटनास्थळावर माहिती देताना केला. यासंदर्भात केमिकल इंडस्ट्रीज नियामक मंडळ असणाऱ्या एमपीसीबी विभागाला तक्रार करण्यात आली होती. तेथील प्रमुख प्रभाकर यांना वारंवार तक्रारी करूनही त्यांनी वेळीच दखल न घेतल्याने आज मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असून इतर उद्योगांना धोका निर्माण झाल्याचेही बेहडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com