चोपडा (जि. जळगाव) - 'आताचे सरकार व यापूर्वीचे आघाडीचे सरकार दोन्हीही धोरणात्मकदृष्ट्या सारखेच आहेत. आताचे सरकार अंबानी, तर यापूर्वी आघाडीचे सरकार टाटा बिर्ला चालवीत होते. यामुळे उद्योगपतीच सरकार चालवीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
चोपडा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, की कर्जमाफीच्या नादात शेतकरी वाट पाहत राहिले. याद्या लावल्या; पण यात काहींचे नावे आले, तर काहींचे आले नाही. कर्जमाफीच्या यादीत नाव नाही म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. "भीक नको कुत्रं आवर' अशी अवस्था शेतकऱ्यांची सरकारने केली आहे. जूनला कर्जमाफी योजना जाहीर केली; खरिपाचा तसेच रब्बीचा हंगाम गेला तरी खात्यात पैसे नाही शेतकरी कर्जमाफीवर आता कविता, लेख सुरू झाले आहेत. उसाचा उतारा चांगली असूनही भाव नाही. कारखानदार व सरकार यांचे साटेलोटे आहे का, असा सवालदेखील त्यांनी केला.
'राज्यात सात कोटी टनांचे सरासरी गाळप होते. यात कमी भावामुळे एक हजार टनाचे पैसे शेतकऱ्यांना कमी मिळत असून, शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. या राज्यात मगर, बिबट्या, वाघ, कुत्र्याला संरक्षण आहे, मात्र माणसांना संरक्षण नाही. प्राणिमित्रांनी हैदोस घातला आहे. गोवंश हत्याबंदीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पशुधन कायद्याच्या बाहेर होते. धर्माच्या नावाखाली शेतकऱ्यांची अवस्था कोलमडली.
आमच्यासाठी गुरांचा गोठा म्हणजे आमचे "एटीएम' कार्ड होते, उत्पादकता कमी झाली, चारा महाग झाल्याने, जनावरे वागणे जिकिरीचे झाले आहे,'' अशी व्यथा त्यांनी मांडली.
|