नाशिक - नोटाबंदीनंतर 50 दिवसांमध्ये पैसे उपलब्ध होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. तसे न घडल्यास सरकारविरुद्ध गुन्हे दाखल करावे लागतील, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिला. तसेच नोटाबंदीनंतरच्या स्थितीची "श्वेतपत्रिका' काढावी अशीही मागणी त्यांनी केली.
महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कॉंग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखतीसाठी विखे-पाटील नाशिकमध्ये आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी एकीकडे "कॅशलेस' म्हणायचे आणि दुसरीकडे नोटा छपाईसाठी धडपड का, असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, की अमेरिकेत 58 टक्के व्यवहार रोखीने होतात. तसेच देशातील साडेसहा लाख खेड्यांपैकी साडेचार लाख खेड्यांमध्ये बॅंक नाहीत. मग एटीएम येणार कोठून? हा खरा प्रश्न आहे. खरे म्हणजे शेतकऱ्यांसह श्रमजीवी सोशिक आहेत म्हणजे, त्यांचा सरकारच्या योजनेला पाठिंबा आहे असे होत नाही. त्यामुळे आगामी सार्वजनिक निवडणुकीत भाजपविरुद्धचा रोष व्यक्त झाल्याचे आपणाला पाहायला मिळेल.
काय म्हणालेत विखे-पाटील?
- नोटाबंदीनंतर शेतमालाचे 50 ते 60 टक्क्यांनी भाव कोसळल्याने सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी
- नवसारीमधील (गुजरात) कार्यक्रमात नवीन नोटांची उधळण करण्यात आली. या नोटा आल्या कोठून?
- नोटाबंदीविषयक निर्णयानंतर 59 वेळा शुद्धीपत्रक काढण्याची वेळ आलीय.
- भाजपने राजकारणाच्या खेळीपासून पावित्र्य राखण्यासाठी महापुरुषांना बाजूला ठेवणे आवश्यक आहे.
|