जळगाव - येथील नवीपेठेतील प्रभात सोडा फाउंटन दुकानासमोर आज दुपारी सव्वादोनच्या सुमारास मैत्रिणीशी बोलणाऱ्या तरुणाला आठ-दहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वरणगाव (ता. भुसाळव) येथील चायनीज खाद्यपदार्थ विक्रेता समीर मेहमूद शेख (वय 25) याची वरणगाव येथील मैत्रीण पोलिस दलातील भरतीसंदर्भात स्पर्धा परीक्षेचा क्लास लावण्यासाठी शहरात आलेली होती. काम आटोपून ती परतत असताना नवीपेठेतील प्रभात सोडा फाउंटन दुकानाजवळ दुपारी सव्वादोनच्या सुमारास मित्र समीर शेख तिला भेटला.
काही वेळ दोघे रस्त्यावरच गप्पा मारत उभे होते. याचवेळी आठ-दहा जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी काहीही विचारणा न करता समीरला बेदम मारहाण केली. त्यानंतर सर्वजण तेथून पसार झाले. एका व्यावसायिकाने शहर पोलिस ठाण्यात फोनवरून घटनेसंदर्भात माहिती दिली. त्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी त्या ठिकाणी आले. त्यांनी समीरला सोबत पोलिस ठाण्यात नेले. त्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात तरुणांविरुद्ध मारहाणीचा आणि ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मोठ्या अप्रिय घटनेचे संकेत
शहरातील खानदेश सेंट्रल मॉलमध्ये तरुणीसोबत असणाऱ्या भुसावळ येथील एका नोकरदार तरुणावरही काही दिवसांपूर्वी असाच हल्ला झाला होता. त्यानंतर शनिपेठेतील तरुणाला मारहाण झाली. मैत्रिणीसोबत चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या अशाच एका तरुणाला मारहाण झाल्यानंतर शहरातील काट्याफैल, गेंदालाल मिल, शाहूनगरातून जमावाने खानदेश सेंट्रल मॉलमध्ये चाल करून जात धुमाकूळ घातला होता. वर्षाच्या सुरवातीला एक जानेवारीच्या रात्री औद्योगिक वसाहत परिसरातील दोन तरुणांवर हल्ला झाला. थोडे दिवस शांत असलेल्या या घटना घडणे पुन्हा सुरू झाले असून, यातून अप्रिय घटना घडण्याचे संकेत अनुभवी ज्येष्ठ पोलिसांनी व्यक्त केले आहेत.
|