दुष्काळाच्या माहेरघरातून द्राक्ष निर्यात वाढली चार पटीने!   

Grapes
Grapes

येवला : गेल्या चार पिढ्या पाण्यासाठी आसुसलेल्या असलेल्या या तालुक्याच्या दुष्काळीपणाचा शाप जणू पाचवीलाच पुजलेला आहे. उन्हाळा आला की, ५० वर गावाची तहान टँकरच्या पाण्याने भागवण्याशिवाय पर्याय नसलेल्या या तालुक्यातील शेतकऱ्यांनी मात्र टंचाईला देखील प्रयोगशीलतेच्या जोरावर शरण आणले आहे. पाणीबाणी असताना येथील तब्बल २०० शेतकऱ्यांनी यंदा तब्बल २ हजार ८७३ मेट्रिक टन द्राक्ष युरोपियन देशांत निर्यात केले आहेत.दोन वर्षापूर्वी जो निर्यातीचा आकडा ३२ शेतकरी व ४०० मे.टन इतका होता, तोच यंदा चार पटीने वाढल्याचे आकडे सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांची ही भरारी कौतुकास्पदच नाही तर प्रेरणादायी देखील आहे.

जलसंधारणाचा पाया घालणारी पेशव्यांची तर आजही दाद दिली जाते त्या धरणांच्या निर्मितीचे जनक असणाऱ्या ब्रिटीशांची राजवट अन वास्तव्य लाभूनही पाणीटंचाईच्या दुष्टचक्रातून या तालुक्याची सुटका होऊ शकलेली नाही. त्याचमुळे आजही येवल्यात पाऊस पडला म्हणजे संबध राज्यात समाधानकारक पाऊस असल्याचे मानले जाते.
राज्यातील टंचाईग्रस्त असलेल्या ९४ तालुक्यांच्या यादीत आजही येवल्याचे नाव पुढे असते.

पाण्याच्या अनुलब्धतेमुळे शेतकरी शेततळयासह अनेक पर्याय शोधून शेतीला बागायती करत आहेत. किंबहुना याचमुळे पीकपद्धती बदलून मका, कपाशी अन कांदा हे पिक येथील मुख्य बनले आहेत,असे असले तरी स्कॉर्च बोनेट मिरची, बांबू, केसर आंबा,
हळद, केळी, शेवगा, आले अशा नाविन्यपूर्ण पिकांची शेती देखील येथे अल्प पाण्यावर फुलली आहे. येथील शेतकरी प्रयोगशील असल्याने स्वस्थ बसत नाहीत, म्हणूनच टंचाईच्या झळाना न जुमानता परदेशातही आपल्या यशाचा सुंगध दरवळत आहेत,हे विशेष.

तालुक्याच्या पूर्व भागात तर पाण्याअभावी आठमाही शेतीच घेणे शक्य आहे.पश्चिम भाग पालखेड कालव्याच्या लाभक्षेत्रात येतो.मात्र हे पाणीही बेभरवशाचे आहे.तरीही शेतकऱ्यांनी याचे नियोजन करून शेती बागायती केली असून द्राक्षासारखे पाण्यावरील पिक यशस्वीपणे घेतले आहेत,नव्हे तर ते परदेशात देखील पोचवले आहे.द्राक्ष निर्यातीत एकवेळ नामोनिशान नसलेल्या या तालुक्याने आता यात मोठी झेप घेतली आहे.

यंदा कृषी विभागाकडे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी ४५५ शेतकर्यांनी ११५ हेक्टर क्षेत्र नोंदवण्यात आले होते.यापैकी २३८ शेतकऱ्यांनी नोंदी नूतनीकरण केल्या.तर प्रथम नोंदणी करणारे शेतकरी २१७ होते.यापैकी २०१ शेतकऱ्याची शेतातून २८७३ मे.टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.कृषी विभागाने शेतकऱ्यांची नोंदणी करतांना एनआरसी, द्राक्ष बागायतदार संघ यांच्या मदतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले. शेतकऱ्यांनी मेहनतीने थॉमसन, क्लोन, सोना या जातींची द्राक्ष निगा राखत निर्यातक्षम उत्पादित केल्याने ऍपेडासह निर्यातदारांच्या मदतीने द्राक्ष यूके, रशिया, बांगलादेश, जर्मनी, नेदरलॅंड, इटली, स्पेन, स्विझरलंड आदि देशांत पोहचली आहेत. साहेबराव बोराडे (मुखेड), साहेबराव बोरनारे, बाळासाहेब पिंपरकर (पाटोदा), अनिल कदम (निळखेडे), विजय वावधाने (देशमाने), योगेश्वर ठोंबरे (पिंपरी) आदि शेतकऱ्यांनी निर्यातीत उच्चांक साधला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शनासह नोंदणीसाठी तालुका कृषी अधिकारी अभय फलके,फायटो सॅनेटरी इन्स्पेक्टर प्रकाश जवने,साईनाथ कालेकर यांचे सहकार्य मिळाले आहे.  

“शेतीत काहीतरी वेगळे करायची तयारी असली कि यश नक्की मिळते.आम्ही हा प्रयत्न केला,त्याला यश आले आहे.कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने पाणीप्रश्न ही भरारी घेता आली. ४बी व इतर ऑनलाईन नोंदी घेतांना सुट्टीच्या दिवशी देखील कृषी विभागाने मदत केली.यामुळे उत्साह अधिक दुणावला.”
- बाळासाहेब पिंपरकर,पाटोदा

“मागील दहा वर्षात द्राक्ष निर्यातीचा आलेख उंचावत राहिला असून यंदा तर विक्रमी निर्यात झाली आहे.शेतकरी देखील प्रतिकूल वातावरण असतांना सकारात्मक राहिले आहे.आम्ही प्रयत्न केले पण शेतकऱ्यांनी जिदीने उत्पादन घेतले.”
- प्रकाश जवने, फायटो सॅनेटरी इन्स्पेक्टर,येवला

 निर्यातीचे आकडे....
२०१५ मध्ये झालेली निर्यात - ४०० मे.टन
२०१६ मध्ये झालेली निर्यात - सुमारे १८०० मे.टन
२०१७ मध्ये झालेली निर्यात - सुमारे २८७३ मे.टन  
यावर्षी एकुण शेतकरी नोंदणी - ४५५
नवीन शेतकरी नोंदणी - २१७
मागील वर्षाचे नुतनिकरण - २३८
एकुण क्षेत्र - २५३.५३ हेक्टर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com