साकोरा - येथील सुनील बाजीराव बोरसे (वय 51) या शेतकऱ्याने नापिकी, अत्यल्प पाऊस आणि सावकारी कर्जाला कंटाळून आज (ता. 10) सकाळी नांदगाव रेल्वेस्थानक ते गेटदरम्यान रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.
यंदा परिसरात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे शेतीसाठी केलेला खर्चही वसूल होणार नाही, असे चित्र आहे. त्यातच कर्जवसुलीसाठी बॅंका आणि खासगी सावकारही तगादा लावत असल्याने परिसरातील शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. महिनाभरापूर्वीच गावातील मच्छिंद्र बोरसे या तरुण शेतकऱ्याने रेल्वेखाली उडी घेऊनच आत्महत्या केली होती.
त्यातच आज सुनील बोरसे यांनी भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. शेतात दुबार पेरणी करूनही उभे पीक पावसाअभावी जळत असल्याचे पाहून ते गेल्या काही दिवसांपासून बेचैन होते. त्यातच, गेल्या वर्षी मुलीचे लग्न झाले आहे. दरम्यानच्या काळात खासगी सावकाराकडून घेतलेले दोन लाख रुपयांचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. बोरसे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, वृद्ध आई- वडील असा परिवार आहे.
|