निफाड - दोन महिने उलटले तरी पाऊस नाही, त्यातच शेतीमालाला भावही नाही अन् बॅंकेकडून मात्र कर्ज वसुलीसाठी तगादा सुरूच असल्याने उगाव (ता. निफाड) येथील एका शेतकऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या केली.
रामदास पांडुरंग बिरार (वय 60) असे त्यांचे नाव आहे. त्यांची दीड एकर शेती आहे. बिरार यांच्यावर 6 लाख 35 हजार रुपयांचे कर्ज होते. परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. तसेच शेतीमालाला भावही नाही. अशातच कर्जाच्या वसुलीसंदर्भात नोटिसा येऊ लागल्याने ते खचले होते. याच चिंतेतून गुरुवारी त्यांनी मध्य रेल्वे मार्गावरील शिवडी शिवारात आत्महत्या केली. त्यांच्या खिशात चिठ्ठी मिळाली असून, त्यात म्हटले आहे, की मी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
|