कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱयाची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱयाची आत्महत्या

जायखेडा (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील खैरओहोळ शिवारातील 28 वर्षीय तरूण शेतकऱ्याने शेतातच विषप्राशन करून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (ता.23) रोजी रात्री सातच्या सुमारास घडली. तालुक्यात एका महिन्यातच दोन शेतकऱ्यांची कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

सततची नापिकी, हातउसनवार व बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे या चिंतेत सापडलेल्या करंजाड येथील अविवाहित तरूण शेतकरी एकनाथ गोविंद चित्ते (वय २८) याने खैरओहोळ शिवारातील त्यांच्याच शेतात विषप्राशन केले. एकनाथ हा वारकरी संप्रदायात नेहमीच मिसळत असल्याने करंजाड येथे काही वेळ थांबलेल्या दिंडीत सहभागी झाला असल्याचे त्यांच्या मित्रांकडून बोलले जाते. तेव्हापासून घरी परतला नव्हता. आई सरूबाई चित्ते या सायंकाळी शेतात प्रसायदानासाठी जात असताना एकनाथ शेतात निपचित पडलेल्या अवस्थेत आढळून आला. सरुबाई यांनी याबाबतची माहिती कुटुंबियांना त्वरीत दिली असता कुटुंबियांनी पोलिस पाटील प्रवीण देवरे व सामाजिक कार्यकर्ते केवळ देवरे घटनास्थळी दाखल झाले.  

त्यानंतर सटाणा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादम्यान त्यांची प्राणज्योत मालवली व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. शेती वडिलांच्या नावे असून, देना बँक ताहाराबाद येथील बँकेचे सव्वा लाखांच्या आसपास कर्ज आहे. याची सातबाऱ्यावरही नोंद केली आहे. तसेच काही हातउसनवार घेतलेले पैसे फेडावे तरी कसे या चिंतेतून एकनाथने विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

जायखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भोये पुढील तपास करीत आहेत. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. एकनाथ यांच्या पश्चात आई, वडिल, भाऊ व भावजय असा परिवार आहे.

कांदा सत्तर पैसे

चाळीत साठवून ठेवलेला कांदा शुक्रवारी (ता.11) रोजी नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 19 क्विंटल कांदा विक्री आणला होता. या कांद्याला सत्तर पैसे किलोने विक्री झाल्याने वाहतूक भाडेही पदरी पडले नसल्याने हताश झाला होता.

चाळीतील पडून असलेला तीस ते चाळीस क्विंटल कांद्याला कोंब फुटू लागले आहे. त्यातच शेतात एक ते सव्वा एकरावर नव्याने कांदा लागवड केली आहे. मात्र, विहिरीला थेंबही नसल्याने त्यांनी बोअरवेल केला होता. पाणीअभावी त्यानेही मान टाकल्याने शेतातील हिरवागार कांदा सोडल्याशिवय पर्याय नसल्याने एकनाथ चिंतित दिसत होता. डोक्यावर असलेल्या कर्जाचा बोजा वाढत चालला होता. याच नैराश्येत सापडलेल्या एकनाथने विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याचे सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com