येवला - कुठलेही राजकारण नाही, फक्त ग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, या मागणीसाठी ग्रामस्थ निवेदन देऊन उपोषणाला बसले. विशेष म्हणजे दोनदा निवेदन दिले तरीही प्रशासनाने परवानगी न घेता उपोषण केल्याचा ठपका ठेवून मुरमी येथील नऊ जणांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. या प्रकाराने सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत आहे.
मुरमी ग्रामपंचायतीअंतर्गत शिवार रस्ते, स्वच्छ भारत शौचालय, वृक्ष लागवड, स्मशानभूमी दुरुस्ती, जलसंधारण योजनेतून गाळ काढणे आणि 38 गाव पाणीपुरवठा पाइपलाइन या शासकीय कामांमध्ये अंदाजे एक कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. याच्या चौकशीच्या मागणीचे पत्र ग्रामस्थांनी 6 मार्चला तहसीलदारासह इतरांना दिले होते. यात तक्रारीची दखल न झाल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.
त्यानुसार हे ग्रामस्थ सोमवारी (ता.18) सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात मंडप टाकून आमरण उपोषणास बसले. सोमवारी सकाळी 11 पासून सुरू झालेले उपोषण रात्री 10च्या सुमारास अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने माजी सभापती संभाजी पवार यांनी मध्यस्थी करून मिटवले होते.
|