घोडसगाव धरणाच्या भिंतीला धोका 

घोडसगाव धरणाच्या भिंतीला धोका 


पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा), ः येथील घोडसगाव मध्यम प्रकल्पाच्या भिंतीवर गेल्या अनेक वर्षांपासून झाडेझुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. झाडांच्या मुळांमुळे भिंतीला तडे जाण्याची शक्यता लक्षात घेता, लघु पाटबंधारे विभागाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी व धोकादायक असलेली झाडे तातडीने तोडावीत, अशी मागणी होत आहे. 
परिसरातील ग्रामस्थांसाठी घोडसगावचा प्रकल्प वरदान ठरला आहे. पाऊस चांगला झाल्यानंतर या प्रकल्पातील पाण्याचा परिसरातील गावांना फायदा होता. गेल्या काही वर्षांपासून धरणाच्या भिंतींची पाहिजे तशी निगा राखली गेली नाही. परिणामी, धरणाच्या भिंतीवर तसेच आतील बाजूस असलेल्या पिचिंगवर काटेरी झाडे वाढली आहेत. पावसाळ्याचे पाणी यात येण्यापूर्वी ही झाडे तोडली गेली नाही तर भिंतीतून पाणी वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही झाडे इतकी मोठी झाली आहेत, की त्यांची मुळे खोलवर गेली आहेत. ज्यामुळे भिंतींना तडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून झाडाझुडपांची तोड न झाल्यामुळे धरणाच्या भिंतीवर अक्षरशः जंगलाचे स्वरूप आलेले आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात यापूर्वी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, त्याची दखलच घेतली जात नसल्याचा अनुभव आजपर्यंत आलेला आहे. 

रस्ताही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत 
घोडसगाव धरणावरून जाणारा रस्ता पिंपळगाव हरेश्‍वरवरुन औरंगाबाद जिल्ह्यात जाण्यासाठी जवळचा आहे. त्यामुळे कमी अंतराच्या या रस्त्यावरून दररोज या शिवारातील शेतकऱ्यांची ये जा सुरू असते. सद्यःस्थितीत या रस्त्यावरून जाताना प्रचंड धूळ उडते. एखादे मोठे वाहन गेल्यानंतर मागून येणाऱ्यांना बराच वेळ रस्ताच दिसत नाही. या रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे या भागातील शेतकऱ्यांना डोळ्यांच्या त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली असता, हा रस्ता जिल्हा परिषदेकडे वर्ग नसल्याने त्याचे डांबरीकरण करता येत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाने हा रस्ता जिल्हा परिषदेकडे वर्ग करावा, अशी मागणी होत आहे. यासोबतच या धरणातील गाळ काढण्यासाठी शासनाने ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या योजनेतून परवानगी द्यावी, अशीही मागणी होत आहे. 

धरणाच्या भिंतीवर काटेरी झाडेझुडपे वाढली असतील तर प्रत्यक्ष धरणावर पाहणी करू. भिंतीला त्यापासून खरोखरच धोका निर्माण झाला असेल तर झाडे काढण्यासंदर्भात वरिष्ठांकडे योग्य तो पाठपुरावा करून झाडे काढली जातील. 
- जी. एस. सांगळे, शाखा अभियंता ः लघु पाटबंधारे विभाग, पाचोरा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com