जळगाव : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरवात झाली. सुरवातीच्या दोन तासातील टप्प्यात जिल्ह्यातील काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.
सकाळी साडेनऊ वाजेनंतरच्या टप्प्यात मतदान केंद्रांवर गर्दी वाढू लागली होती. जिल्ह्यात पहिल्या दोन तासांच्या टप्प्यात सरासरी 7 ते 9 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
जिल्हापरिषदेचे 67 गट व पंचायत समित्यांच्या 134 गणांसाठी निवडणूक होत असून तीन टर्मपासून जिल्हापरिषदेत सत्तेत असलेल्या भाजपला यावेळी सत्ता राखण्याचे आव्हान आहे. माजीमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शिवसेनानेते सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
|