नाशिक - जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर नजीक असलेल्या हरिहर गडावर मधमाश्यांनी केलेल्या कब्जातून पुण्याच्या शिखर फाउंडेशन व बी बास्केट संस्थेच्या साहसी वीरांनी स्वारी करीत मधमाश्यांच्या तावडीतून किल्ल्यावर जाणारी वाट पर्यटकांसाठी मुक्त केली.
हरिहर गडाच्या अवघड वाटेवर काही दिवसांपूर्वी भलेमोठे आग्या मोहळाचे पोळे लागले होते. संपूर्ण गडाला या मधमाश्यांनी वेठीस धरले होते. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उंच कडा, अशा स्थितीत काही पर्यटक आपला जीव धोक्यात घालून मोहळाच्या खालूनच सरपटत पुढे जात. ही कृती जीवघेणी ठरू शकते, याची जाणीव "रानवाटा'च्या गिर्यारोहकांच्या लक्षात आली. त्यांनी छायाचित्रासह ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाच फेब्रुवारी रोजी विविध ग्रुपच्या माध्यमातून राज्यभर पाठविली. याचा धागा पकडून पुणे येथील शिखर फाउंडेशन ऍडव्हेंचर क्लब आणि मधमाश्यांचे संवर्धन करणारी बी बास्केट संस्था यांनी संयुक्तपणे गडाला, पर्यायाने पर्यटकांना मधमाश्यांच्या जाचातून मुक्त करण्याचे ठरविले.
शनिवारी (ता. 16) मध्यरात्री या "रेस्क्यू टीम'ने हरिहरच्या दिशेने कूच केले. पर्यटक गडावर येण्याच्या अगोदर ही मोहीम फत्ते करणे आवश्यक असल्याने विश्रांती न घेताच सर्व जणांनी आज सकाळी सात वाजता आवश्यक साहित्याची जुळणी करून गडावर चढाई सुरू केली.
फाउंडेशनचे अध्यक्ष विवेकानंद तापकीर, शिवाजी आंधळे, सुधीर गायकवाड, "बी बास्केट'चे अध्यक्ष अमित गोडसे, अजिंक्य उनवणे, राजू पवार आणि छायाचित्रकार बिनीत रॉय हे या मोहिमेत सहभागी झाले होते.
दीड तासाच्या खड्या चढाईनंतर किल्ल्यावर जाणाऱ्या एकमेव वाटेवर डोके लागेल अशा ठिकाणी मोहळाचे भले मोठे पोळे दिसले. मोहोळ काढण्यासाठी त्यांची गडबड सुरू झाली. पण काही मंडळी अगोदरच गडावर पोचल्याने त्यांना दरवाजापर्यंत येऊ देण्याशिवाय पर्याय नव्हता. दरम्यान, खालच्या बाजूने नाशिक पोलिसांची एक टीम पर्यटनासाठी येत होती. त्यांना या मोहिमेची कल्पना देताच त्यांनी वर येणाऱ्या पर्यटकांना खालीच रोखले. अमित गोडसे यांनी सर्व सूत्रे हाती घेतली.
सर्वांनी मधमाश्यांपासून संरक्षणासाठीचे सूट घातले. पर्यटकांच्या सुरक्षेबरोबर मधमाश्यासुद्धा जगल्या पाहिजेत, हाही त्यांचा उद्देश होता. त्यामुळे प्रथम राजू पवार आणि गोडसे यांनी "स्मोक मशिन'ने हलकासा धूर देऊन मधमाश्यांना त्यांच्यावरील कारवाईची कल्पना दिली आणि काही वेळातच मोहीम फत्ते केली.
|