राज्यातील सहा पाणथळमध्ये हतनूर जलाशय 

hatnur dam jalgaon
hatnur dam jalgaon

जळगाव : महाराष्ट्रातील सहा महत्त्वाच्या "पाणथळ' जागांच्या संवर्धनाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी राज्याच्या वन विभागाने पुढाकार घेतला आहे. "बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' सोबत (बीएनएचएस) सामंजस्य करार करून पुढील चार वर्षांमध्ये हा कृती आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या सहा पाणथळ जागांसंबधी संवर्धनात्मक धोरणांच्या निर्मितीकरिता हा राज्य कृती आराखडा महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. 
सहा पाणथळीमध्ये हतनूर जलाशय (ता. भुसावळ), जायकवाडी, गंगापूर, नांदुरमधमेश्वर, विसापूर आणि उज्जनीच्या पाणलोट क्षेत्राचा समावेश आहे. 

पक्ष्यांच्या मध्य-आशिया स्थलांतरित पट्ट्याअंतर्गत भारतातील पाणथळींच्या संवर्धनाकरिता "बीएनएचएस'ने राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे. गतवर्षी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या आराखड्याला मान्यता दिली होती. याअंतर्गत पुढील चार वर्षांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांबरोबर देशातील पाणथळ जागांच्या संवर्धनाकरिता कृती आराखडा तयार करण्याचे काम करण्यात येणार आहे. राष्ट्रीय कृती आराखड्यात महाराष्ट्रातील केवळ तीन आणि शिवडी- न्हावा शेवा-अलिबाग या अखंडित स्वरूपातील पाणथळीचा समावेश आहे. त्यामुळे वन विभागाने "बीएनएचएस'च्या मदतीने राज्याचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे निश्‍चित केले आहे. या संबंधीची घोषणा लोणावळा येथे नुकत्याच झालेल्या "बीएनएचएस' आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत "कांदळवन संरक्षण विभाग'चे ( मॅंग्रोव्ह सेल) अप्पर मुख्य प्रधान वनसंरक्षक एन. वासुदेवन यांनी केली. 
बीएनएचएसने "मध्य-आशिया हवाईमार्गावरील स्थलांतरित पक्षी आणि पाणथळ जागा' या विषयावर लोणावळ्यात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. कृती आराखड्याकरिता बीएनएचएससोबत सामंजस्य करार लवकरच करण्यात येणार आहे. 

चार मुद्यांवर होईल काम 
राज्य कृती आराखड्याकरिता निवडण्यात आलेल्या सहा पाणथळीच्या जागा पक्ष्यांच्या मध्य-आशिया स्थलांतरित पट्ट्यामधील महत्त्वाच्या जागा आहेत. राष्ट्रीय कृती आराखड्याप्रमाणेच या आराखड्यातील पाणथळींच्या विकासाबाबत बीएनएचएस चार मुद्यांवर काम करण्यात येईल. सहा पाणथळ जागांची जैवविविधता तपासणे, त्याठिकाणी स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांची मोजणी व स्थलांतर पट्ट्याच्या अभ्यास करणे, या जागांच्या संवर्धनासाठी तेथील वनकर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आदी मुद्यांचा समावेश आहे. हा संपूर्ण कृती आराखडा तयार करण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार असून त्यासाठी 2 कोटी सहा लाखांचा खर्च अपेक्षित आहे. 
 
हतनूर जलाशयावर दरवर्षी 300 प्रजातींचे देश, परदेशातील पक्षी येतात. या पक्षाचा येथे अधिवास असतो. देश विदेशातील पक्षांना हिवाळा हा ऋतू येथे येऊन एकत्र अधिवासासाठी योग्य वाटतो. यामुळे हतनूर जलाशयाचा "पाणथळ'मध्ये समावेश करावा यासाठी आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. 
-अनिल महाजन, चातक निसर्ग संवर्धन संस्था अध्यक्ष, वरणगाव. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com