नाशिक : राज्यातील 34 जिल्ह्यांतील 325 तालुक्यांमधील शेतीचे ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील "कयार' आणि "महा' चक्रीवादळामुळे तयार झालेल्या परिस्थितीत अवकाळी पावसाने नुकसान झाले. राष्ट्रपती राजवटीत राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात दोन हजार 59 कोटी 36 लाखांची मदत देण्यात येईल.
नाशिकसाठी 181, जळगाव 179, तर नगरच्या 135 कोटींचा समावेश
उत्तर महाराष्ट्रात नाशिकसाठी 181 कोटी 50 लाख, जळगाव- 179 कोटी 98 लाख, धुळे- 74 कोटी 87 लाख, नंदुरबार- एक कोटी 13 लाख, तर नगर- 135 कोटी 55 लाखांचा समावेश आहे. औरंगाबाद- 121 कोटी 81 लाख, जालना- 110 कोटी 21 लाख, बीड- 144 कोटी 18 लाख, लातूर- 100 कोटी 68 लाख, नांदेड- 123 कोटी 14 लाख, बुलडाणा 136 कोटी 13 लाख, यवतमाळ- 101 कोटी 96 लाखांची मदत जाहीर झाली आहे.
आपत्तीबाधित तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना पिकांसाठी हेक्टरी आठ हजार आणि बहुवार्षिक फळबाग पिकांसाठी हेक्टरी 18 हजार रुपयांची व दोन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत मिळणार आहे. याशिवाय आपत्तीबाधित तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षाशुल्कात माफी या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. विभागांनी आवश्यक तरतूद करून ही माफी द्यायची आहे. नुकसानीची मदत 33 टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना मिळणार आहे. कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवकांच्या स्वाक्षरीने झालेल्या पंचनाम्यानुसार ही मदत जिल्हाधिकाऱ्यांनी वाटप करायची आहे. संबंधितांच्या बॅंक बचत खात्यात थेट रक्कम जमा केली जाईल. कोणत्याही बाधितांना रोखीने अथवा निविष्ठांच्या स्वरूपात मदत दिली जाणार नाही. मदतीच्या रकमेतून कोणत्याही बॅंकेने कसल्याही प्रकारची वसुली करायची नाही. त्यासाठी सहकार विभागातर्फे आदेश जारी होतील. शिवाय ही मदत विशेष बाब असल्याने पूर्वीचे उदाहरण म्हणून विचारात घेतली जाणार नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.