धुळे : पावसाला सुरवात झाल्याने वातावरणात बदल झाला आहे. परिणामी व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढत आहे. सर्दी, खोकला, डोकेदुखी, तापाचे (फ्लू) रुग्णदेखील वाढत आहेत. शहरात कावीळ व डायरियाच्या रुग्णांमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बदलते वातावरण, दूषित पाणी आणि कोरोनाचा संसर्ग पाहता नागरिकांनी दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.
थंड, गरम अशा मिश्र वातावरणामुळे ज्येष्ठ नागरिकांसह चिमुकल्यांमध्ये सर्दी, खोकला आणि तापाच्या तक्रारी वाढताना दिसून येत आहेत. आठवड्याभरात २० टक्क्यांनी व्हायरलचे रुग्ण वाढले आहेत. या रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका आहे. यासोबतच शहरात डायरिया, कावीळ आणि पोटदुखी आजाराच्या रुग्णांच्या संख्येत तब्बल १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढती रुग्णसंख्या व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी उकळून प्यावे व बाहेरचे अन्न टाळावे, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
लहान मुलांमध्ये डायरियाची लक्षणे दिसत आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याच्या विविध भागांत डायरियाचे रुग्ण आढळत आहेत. आगामी काळात यात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच डेंगी आणि हिवतापाच्या रुग्णातही वाढ होण्याची होण्याची शक्यता असल्याने पालकांनी आतापासूनच खबरदारी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले. पावसाळ्याचे दिवस सुरू होताच व्हायरल फिवर आणि डायरियाने तोंड वर काढले आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये जुलाब, उलट्या आणि पोट दुखणे आदी लक्षणे आढळून येत आहेत. परिणामी शरीरातील पाणी मोठ्या प्रमाणात निघून जात असल्याने डिहायड्रेशन होत आहे. पालकांनी मुलांच्या लक्षणांकडे तत्काळ लक्ष देऊन वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावेत. उपचारास विलंब झाल्यास पोटात व इन्फेक्शन झाल्यास त्रास वाढण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञ सांगतात. अतिसारासंदर्भातील लक्षणे दिसताच अनेक पालक मेडिकलवरून परस्पर औषधे देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, डायरियामुळे ओआरएस वगळता इतर औषधे परस्पर देण्याची जोखीम घेऊ नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
महत्त्वाची खबरदारी; ही आहेत लक्षणे
पावसाळ्यात आवर्जून उकळून पाणी प्यावे. तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थ प्रकर्षाने टाळावे. दूषित पाणी आणि अन्न यातून डायरिया होण्याचा धोका असतो. घर आणि परिसराची स्वच्छता ठेवावी. उघड्यावर पाणी साचून डासोत्पत्ती होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पोटात दुखणे, ताप, मळमळणे, जुलाब आणि उलट्या होणे ही डायरियाची प्रमुख लक्षणे आहेत. जुलाबामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.