जळगाव - शिवसेनेचे खासदार संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून तर भाजप पक्षाच्या सर्वच नेत्यांविरुद्ध बोलत असतात. त्यांच्या जिभेला हाड नाही. त्यामुळे आम्हीच नव्हे, तर जनताही आता त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असे मत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भाजप आणि भाजप नेत्यांवर टीका करून त्यांचा खरपूस समाचार घेतला. याबाबत जिल्ह्यातील मंत्री महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की संजय राऊत काय बोलतात याकडे आम्ही आता लक्ष देत नाही, त्यांच्या जिभेला हाड नाही. ते दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि भाजपच्या अन्य नेत्यांविरुद्ध बोलत असतात. मात्र, आता आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नाही. जनताही आता त्यांच्या या बोलण्याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ते बोलत राहिल्यास आम्हाला कोणताही फरक पडत नाही. आता ते आमच्या आणि जनतेच्या दृष्टीनेही अदखलपात्र झाले आहेत.
|