विद्यार्थ्यांना तीन वर्षांची शिष्यवृत्ती मिळणारच 

विद्यार्थ्यांना तीन वर्षांची शिष्यवृत्ती मिळणारच 

शहादा - जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातीच्या सर्व विद्यार्थ्यांना गत तीन वर्षांची शिष्यवृत्तीची रक्कम का मिळाली नाही, याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश समाजकल्याण विभाग व एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाला देण्यात आले आहेत. वंचित विद्यार्थ्यांना गेल्या दोन्ही आणि चालू वर्षाच्या शिष्यवृत्तीची रक्कम तत्काळ अदा करण्याचे आदेश देण्यात आले असून, भविष्यात एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या रकमेपासून वंचित राहणार नाही, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नाही. यातच १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. परिणामी हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या रकमेपासून वंचित आहेत. दरवर्षी महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरले जातात. मात्र पुढील कारवाई होत नाही. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. आज तहसील कार्यालयानजीक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पणासाठी राज्यमंत्री श्री. आठवले आले असता त्यांच्याशी ‘सकाळ’ने या विषयावर संवाद साधला.

राज्यमंत्री आठवले म्हणाले, की शिष्यवृत्ती प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल. शिष्यवृत्ती हा विद्यार्थ्यांचा हक्क असून, शिष्यवृत्तीतून मिळणाऱ्या रकमेतून राज्यात व देशात अनेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. पैशांअभावी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी केंद्र व राज्य शासन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते. शिष्यवृत्ती हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे. ती त्यांना वेळेवर मिळायलाच पाहिजे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळाली नाही, ही बाब गंभीर आहे. शिष्यवृत्तीस विलंब का झाला, याबाबत समाजकल्याण व एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाला तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच चालू शैक्षणिक वर्षासह मागील शिष्यवृत्तीची रक्कमही विद्यार्थ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करण्याबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सहाय्यक समाजकल्याण अधिकारी राकेश महाजन, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कुवर, अनिल कुवर यांच्यासह समाजकल्याण विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते.

कारवाई करणार - आठवले
विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीसारख्य्या गंभीर प्रश्‍नाला ‘सकाळ’ने वाचा फोडून माझ्यासह शासनाचे लक्ष वेधले, याबद्दल मी ‘सकाळ’चे कौतुक करतो, असे सांगून राज्यमंत्री आठवले म्हणाले, की शिष्यवृत्तीप्रकरणी आपण स्वतः गंभीर असून, शिष्यवृत्तीची रक्कम हडप करणाऱ्या अधिकारी व संस्थाचालकांवरही कठोर कारवाई करण्यात येईल. समाजकल्याण विभाग व आदिवासी प्रकल्प विभागाने जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी त्या- त्या महाविद्यालयाकडून प्राप्त करून यावर तत्काळ कारवाई करावी. या कारवाईस विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा श्री. आठवले यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com