जळगाव - जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे दाऊदच्या नातेवाइकाच्या विवाह सोहळ्याला दिलेल्या उपस्थितीची चौकशी करून, यातील "दूध का दूध आणि पाणी का पाणी' सत्य शोधावे, असे शिवसेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
पाटील म्हणाले, की जनतेच्या मनात कोणतीही शंका राहू नये यासाठी या प्रकरणाची चौकशी करावी. भोसरी येथील जमीन प्रकरणाची एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू आहे. आता जलसंपदामंत्री महाजन यांचीही चौकशी करून दाऊदप्रकरणी त्यांचा काय संबध आहे का, हे सत्य जनतेसमोर आणावे.
पाटील म्हणाले, राष्ट्रीयीकृत बॅंका शेतकऱ्यांना दारात उभे करीत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. हंगामाला आता थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही, तर ते सावकारांकडून मिळेल त्या व्याजदरात कर्ज घेतील, त्यामुळे शासनाने धोरण बदलून जिल्हा बॅंकांना रक्कम उपलब्ध करून द्यावी.
|