नंदुरबार - देशात प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे, तसा तो तृतीयपंथीयांनाही आहे. मात्र, या घटकाकडे मतदान नोंदणी मोहिमेत दुर्लक्ष केले जात असल्याची खंत येथील रवींद्र परशुराम जोगी यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांत तीन हजार तृतीयपंथी आहेत. त्यात काही नोंदणीकृत आहेत, तर अन्य छुप्या पद्धतीने वावरत आहेत. तृतीयपंथीयांकडे रेशन कार्ड, आधार कार्डसह अन्य आवश्यक कागदपत्रे नाहीत. शासन त्याबाबत गंभीर नाही. परिणामी खानदेशातील तीन हजार तृतीयपंथी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. नवीन मतदारवाढीसाठी निवडणूक यंत्रणेकडून मतदान नोंदणी जनजागृती केली जाते. मात्र, या मोहिमेत तृतीयपंथी या घटकाकडे दुर्लक्ष केले जाते. कायद्याने तृतीयपंथीयांना संरक्षण मिळाले आहे. मात्र, प्रशासन त्यांची अंमलबजावणी करीत नसल्याचे चित्र आहे, असे जोगी यांचे म्हणणे आहे.
|