नाशिक रोड - किसान सभेतर्फे मार्चमध्ये काढण्यात आलेल्या लॉंग मार्चला राज्य सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्याचा जाब विचारण्यासाठी दिल्लीत 5 सप्टेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आज सकाळी आमदार जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी 18 बोग्यांच्या खास रेल्वेने दिल्लीला रवाना झाले आहेत.
नाशिक रोड रेल्वे स्थानकावर सकाळी साडेदहाला खास रेल्वेचे आगमन झाले. अकराला शेतकऱ्यांना घेऊन रेल्वे दिल्लीकडे रवाना झाली. पोलिस, रेल्वे सुरक्षाबल आणि अधिकारी यांनी सर्व शेतकऱ्यांना बोगीत बसविण्यासाठी सहकार्य केले. शेतकऱ्यांच्या उपस्थितीमुळे फलाट क्रमांक एकवर सिंहस्थ कुंभमेळासारखे स्वरूप झाले होते.
कुंभमेळ्यानंतर इथे पहिल्यांदा एवढी गर्दी झाली. दरम्यान, रेल्वेस्थानकावर पहाटेपासूनच बाहेरगावचे शेतकरी दाखल होण्यास सुरवात झाली होती. त्यातच रविवारची सुटी असल्याने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने फलाटावरील सुरवातीपासून शेवटपर्यंत गर्दी होती.
मोर्चाच्या मागण्या
वनहक्क जमीन कायद्याची अंमलबजावणी करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, शिधापत्रिका बदलून द्या, विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती करा, विविध योजनांचा तत्काळ लाभ द्या, वीजबिल माफ करा, कंत्राटी कामगारांना किमान वेतन द्या, विकासकामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचे कारस्थान बंद करा आदी मागण्या मोर्चावेळी करण्यात येणार आहेत. मार्चमधील नाशिक ते मुंबई लॉंग मार्चमध्ये या मागण्यांचा समावेश होता.
|