
Kisan Yojna News : पीएम किसान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी
Nandurbar News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ अखंडीतपणे मिळावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत १४ व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी १ मेपासून गावपातळीवर सर्वत्र मोहिम राबवून ई-केवायसीसाठी सामाजिक सुविधा केंद्र (सीएससी) व बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी इंडीया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) यांच्या समन्वयाने कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. (Kisan Yojana News Farmers should do e KYC for benefit of PM Kisan Yojana dhule news)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
केंद्र शासनाने पीएम किसान पोर्टलवर शेतकरी सदरात ओटीपीच्या आधारे, तसेच सामाईक सुविधा केंद्रामध्ये व अँड्रॉईड मोबाईलवर पीएमकिसान ॲपवरसुद्धा ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
या सुविधेमुळे लाभार्थ्यांना स्वत:सह अन्य ५० लाभार्थ्यांचेही ई-केवायसी प्रमाणिकरण करता येणार आहे. पीएम सन्मान योजनेचा अंखडीत लाभ घेता यावा यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसीसाठी आपले आधारकार्ड घेवून सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्रावर, तसेच नजीकच्या पोस्ट कार्यालयात जावून ई-केवायसी करावी.
जे शेतकरी ई-केवायसी करतील, त्यांनाच यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी असे आवाहन श्रीमती खत्री यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.