लासलगाव - गतवर्षीचा अंदाज घेता यंदाही टोमॅटोला चांगला भाव मिळेल म्हणून येथील शेतकरी सुनील पवार यांनी एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली; परंतु अवकाळी पाऊस आणि कोसळलेल्या भावामुळे लागवडीचा खर्च आणि मजुरी जाऊन हाती काहीच राहत नसल्याने पवार यांनी टोमॅटो बाजारात नेण्यापेक्षा नाइलाजाने तो रस्त्यावर फेकून दिला.
गेल्या वर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळाला. त्यामुळे यंदाही टोमॅटोला चांगला भाव मिळेल, या आशेने पवार यांनी आठ हजार रुपये खर्च करून टोमॅटोची लागवड केली. लागवडीचा खर्च, कीटकनाशके आणि शेतमजुरांची मजुरी असा त्यांना मोठा खर्च आला. काही दिवसांपूर्वी टोमॅटोला 700 रुपये क्रेट असा भाव मिळाला होता; पण अवकाळी पाऊस, विदेशात होणारी निर्यात थांबल्याने कोसळलेल्या भावाचा परिणाम म्हणून टोमॅटोचे भाव 250 रुपयांवर येऊन पोचले. टोमॅटो विक्री करताना शेतकऱ्यांना प्रतिक्रेट्स 25 रुपये मजुरी द्यावी लागते; पण क्रेट्सलाच अडीचशे रुपये भाव मिळाल्याने टोमॅटो विकून हाती काहीच राहणार नाही. त्यामुळे टोमॅटो विकण्यापेक्षा फेकून दिलेलेच चांगले, असा विचार करून लाल भडक टोमॅटो त्यांनी रस्त्यावर फेकून दिले.
कुठल्याच शेतीमालाला बाजारभाव मिळत नसेल, तर आता शेतीत लावायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर शेतकऱ्यांनी शेती करायची की नाही?
- सुनील पवार, शेतकरी
|