इथल्या मूलभूत प्रश्‍नाकडे दुर्लक्षच..!

thangav.jpg
thangav.jpg

विजय बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : साडेसात हजार लोकसंख्या व एक आरोग्यसेविका, या प्रमाणात ठाणगाव (ता. सिन्नर) येथील आरोग्यसेवा पुरविली जात आहे. सहा आशा कार्यकर्तींकडून दररोज 20 घरांतील लोकांची आरोग्य तपासणी हाती घेतल्याने ठाणगावकरांचे आरोग्य आता आशासेविकांच्या हातात आले आहे. नळाला येणारे अशुद्ध पाणी, विषाणुजन्य आजारांची साथ अशा विविध कारणांनी ग्रामस्थ बेजार झाले आहेत. पुरेशा प्रमाणात शासकीय आरोग्यसेवा मिळत नसल्याने खासगी रुग्णालये हाऊसफुल झाली आहेत. 

अनेक वर्षांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता
सिन्नर तालुक्‍यातील लोकसंख्या, तसेच राजकारणातही तरबेज मोठे बागायती गाव म्हणून ठाणगावची ओळख आहे. भाजीपाला उत्पादनात अग्रेसर या गावात गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. ग्रामस्थांकडून वारंवार मागणी करूनही पुरेशे कर्मचारी मिळालेले नाही. गावपरिसरात आदिवासी, तसेच मागासवर्गीयांची संख्या अधिक असल्याने पर्यायाने गरिबांना खासगी रुग्णालयात महागडे उपचार घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे. हंडा किंवा बादलीत घेतलेल्या पाण्यात तळही दिसत नाही इतका गढूळ पाणीपुरवठा गावात सुरू आहे. पर्यायाने लोकांवर जारचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. 

साडेसात हजार लोकसंख्येच्या गावात एकच आरोग्यसेविका
दूषित पाणीपुरवठ्यामुळे घरोघरी एक माणूस आजारी असल्याचे चित्र सध्या गावात आहे. दूषित पाण्यावर शासकीय पातळीवरून कोणतीही उपाययोजना केली जात नाही, तर आरोग्य यंत्रणेचे पाणी नमुणेही घेतले जात नाही. त्यामुळे ठाणगावकरांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. सद्यःस्थितीत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्यसेविकांकडून केला जाणारा असंसर्ग प्रतिबंध अभियानांतर्गत सर्व्हे सुरू आहे. साडेसात हजार लोकसंख्येच्या गावात एकच आरोग्यसेविका असल्याने सहा आशासेविकांमार्फत हा सर्व्हे सुरू आहे. या उपक्रमात अंगावर चट्टे, कुष्ठरोग, टीबी, हृदयरोग, मधुमेह, तसेच व्यसनाधिनता अशा विविध आजारांच्या रुग्णांची नोंदणी आशासेविकांकडून केली जात आहे. आजारी असेल तर सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्लाही आशासेविकांकडून दिला जात आहे. घरात कोणी आजारी आहे का? असा प्रश्‍न करत केवळ दरवाजावर भेटीची नोंद लिहीत आरोग्य विभागाचे असंसर्ग प्रतिबंध अभियान सुरू आहे. 

मूलभूत प्रश्‍नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 

दूषित पाणीपुरवठा, डेंगीसदृश आजार, तसेच साठविलेल्या पाण्यात उत्पन्न होणारे डास यावर शासकीय यंत्रणेमार्फत कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त नेत्यांना या मूलभूत प्रश्‍नाकडे लक्ष देण्यास वेळ मिळेल का, असा प्रश्‍न ग्रामस्थ करू लागले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com