गोणीचे वजन कमी केल्याने युरियाचा वापर कमी होईल?

urea
urea

येवला - शेतकऱ्याकडून लाडके रासायनिक खत बनलेल्या युरियाचा वापर वारेमापपणे होत आहे. या बेसुमार वापरावर मर्यादा आणण्यासाठी केंद्र सरकारने युरियाच्या गोणीचे प्रमाण ५० किलोच्या ऐवजी ४५ किलोची गोणी केली आहे. यामुळे गोणीमागे पाच किलोची घट होणार आहे. पण ही घट वापरात होईल का याविषयी मात्र प्रश्नचिन्हच आहे. शेतकरी मात्र आशावादी आहे. कमी किंमत आणि अधिक उत्पादन देणारे खत म्हणून शेतकरी वर्षानुवर्षे युरीया खताला आपलेसे करत आहेत. मात्र यामुळे जमिनीचा खालावत चाललेला पोत व होणारी हानी मात्र दुर्लक्षित असल्याचे दिसत आहे. जमिनीची सुपीकता कायम राखण्याकडे दुर्लक्ष करत शेतकरी उत्पादनवाढीसाठी शिफारशीपेक्षा जास्त खते वापरत आहेत. यामुळे सुपीकता कमी होऊन जमीन नापिक बनत आहे. शिवाय अनुदानाचा भार सरकारवर पडत असल्याने युरियाचा प्रमाणीत वापर करण्याची सवय शेतकऱ्यांना लागावी व जमिनीची प्रत बिघडू नये या हेतूने ४५ किलोची गोणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युरियाचा वाढता वापर टाळण्याबरोबरच टंचाई कमी करण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत.

विक्रेत्यांकडे अजून जुन्याच गोण्या!
१ एप्रिल पासून हा बदल करण्यात आला असला तरी अजून विक्रेत्याकडे ५० किलोच्या गोण्या उपलब्ध आहेत. या निर्णयानुसार कंपन्यांनी पॅकिंगमध्ये बदल करत आता नव्याने ४५ किलोच्या गोणीची निर्मिती केली आहे. मात्र या वजनाच्या गोण्या १५ एप्रिल पर्यत उपलब्ध होतील असा अंदाज आहे. पन्नास किलोची किंमत २९५ रुपये होती आता ४५ किलोचे गोणी २६६ रुपयांना मिळणार असल्याचे येथील द्वारका एजन्सीचे संचालक नितीन काबरा यांनी सांगितले. वजन घटल्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. मात्र अनेक जण या विशेष समाधानी नाही. वजन कमी करण्यापेक्षा जनजागृती महत्वाची असून, जेथे एका गोणीत काम होत होते तेथे आता शेतकऱ्यांना वरील पाच किलोसाठी दुसरी गोणी खरेदी करावी लागणार आहे. अर्थात जे शेतकरी एकरी गोणीचा मापन लावतात अशा शेतकऱ्यांकडे मात्र युरिया वापरावर नक्कीच बचत होईल अशी दुसरी भूमिका देखील शेतकरी बोलून दाखवत आहेत.

"गोणी ४५ किलो केली असली तरी शेतकरी वर्गाचे एकरी माप आहे तेच राहणार आहे. त्यामुळे पाच किलोसाठी दुसरी गोणी खरेदीचा भुर्दंड वाढेल. प्रगतशील शेतकरी वर्गाला याचा अधिक फटका बसेल कारण एक गोणी जरी वाढली तरी त्याचा खर्च त्या शेतकरी वर्गाला करावा लागेल"
- बबन शिंदे,शेतकरी,जळगाव नेऊर

"युरीया मधे कोटेड निमकोटेड तसेच प्लेन आसा युरीया विकला जातो. ५० किलोची गोणी हुक लावून ४७/४८ किलोच असायची आणि आता ४५ किलोची युरीया गोणी देणार म्हटल्यावर ती ४२/४३ किलोच भरणार म्हणजे कोणत्याही बाजुने विचार केला तरी नुकसानीचा फटका हा शेतकऱ्यांनाच बसणार आहे. शासनाने शेतकरी हिताचे निर्णय घेणे गरजेचे आहे.
- सुरेशबापू मढवई, शेतकरी चिचोंडी खुर्द

"शेतकरी क्षेत्र व गोणी असे समीकरण वापरतात. मात्र फवारणी करताना पिकांच्या दर्जानुसार एकरी किती गोळ्या टाकायचा हे शेतकऱ्याने अगोदरच ठरवलेले असते. त्यामुळे वजन करण्याचा निर्णय शेतकरी हिताचा असला तरी सध्याच्या परिस्थितीती बदलासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.
- समाधान चव्हाण,शेतकरी,राजापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com