goverment property
goverment property

शासकीय उदासीनता इतकी, की लाखोच्या प्रॉपर्टीला चढतोय गंज 

तळोदा (नंदुरबार) : येथील अनेक शासकीय कार्यालयांत गेल्या कित्येक वर्षांपासून वाहने लिलावाच्या प्रतीक्षेत ऊन, वारा व पावसाचा सामना करीत तशीच पडून आहेत. शासकीय उदासीनतेअभावी या वाहनांचा वेळीच लिलाव न झाल्याने आता काही वाहनांची परिस्थिती इतकी खराब झाली आहे, की त्यांना भंगारमध्ये देखील कोणी विकत घेणार नाही. मात्र त्यामुळे संबंधित विभागांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असून, यास जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे. 
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अनेकदा कारवाई करीत संबंधित विभाग अशा वाहनांना जप्त करीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत असतात. काही वेळा संबंधित विभागाने ठोठावलेला दंड भरून वाहन व मुद्देमाल सोडविण्यात येतो. तर काहीवेळा दंड न भरल्याने जप्त केलेली वाहने तसेच पडून असतात. त्यामुळे अशा पडून असलेल्या वाहनांवर पुढील प्रक्रिया करून त्यांचा लिलाव करणे आवश्यक असते. नाहीतर ती पडून-पडून गंजून जातात व लाखो रुपयांचा मालमत्तेचा चुराडा होतो. 

वाहनांना जागीच गंज 
प्रशासकीय कारवाई करून जप्त केलेली काही वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात पडून आहेत. त्यापैकी काही वाहने महसूल विभागाने, तर काही वाहने इतर विभागांनी कारवाई केलेली आहेत. ही वाहने कित्येक वर्षांपासून तशीच पडून- पडून अक्षरशः गंजून गेली आहेत. एकंदरीत वाहनांची अवस्था बघता ही वाहने लिलावात कोणी विकत घेण्यास उत्सुकता दाखवेल याबाबत शंका येते आणि कोणी उत्सुकता दाखवलीच तर त्यांना कवडीमोल किमतीत विकत घेतील. एकप्रकारे शासकीय उदासीनतेमुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसानच होणार आहे. 

मुदत संपलेली वाहने पडून 
त्याचप्रमाणे खूप वर्षांपूर्वी रेशन वाहतूक करणारी, सार्वजनिक बांधकाम विभागातील व इतर अनेक शासकीय कार्यालयांतील मुदत संपलेली किंवा निकामी झालेली वाहने देखील लिलावाअभावी तशीच उभी आहेत. यापैकी काही वाहनांच्या महत्त्वपूर्ण स्पेअर पार्टची चोरी झाली आहे, तर काही वाहनांचे पार्ट अक्षरशः खिळखिळे झाले आहेत. वेळीच लिलाव न झाल्याने कदाचित आता ही वाहने भंगारात देखील विकली जाणार नाहीत इतकी वाईट अवस्था त्यांची झालेली आहे. त्याचप्रमाणे या वाहनांचा आजूबाजूला अस्वस्थता देखील दिसून येते. त्यामुळे प्रशासनाने आतातरी पुढील कारवाई करीत या वाहनांचा लिलाव करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

दुर्लक्ष करण्यात धन्यता 
कारवाई करून ताब्यात घेण्यात आलेली वाहने कधी पुढील चौकशी- फेरचौकशीच्या जाळ्यात अडकतात व कित्येक वर्ष तीच प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे संबंधित विभाग देखील या वाहनांकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानतात, असा अनुभव आहे. वर्षानुवर्षे पडून असल्यामुळे काही वाहनांची सद्यःस्थिती सांगणे देखील कठीण होऊन जाते. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com