ग्राम समित्या, दल केवळ कागदावरच; प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत असल्याने प्रश्‍नचिन्ह 

gram committee
gram committee

तळोदा (नंदुरबार) : तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या मुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थापन केलेल्या ग्रामदक्षता समिती व ग्रामरक्षक दल खरोखरच आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत का? याबाबत शंका उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी या समित्या व दल फक्त कागदावरच असून, कोरोनाचा वाढता आलेख पाहता वरिष्ठांनी यात लक्ष घालून या समित्यांना प्रत्यक्षात सक्रिय करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या समित्यांमधील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याने किंवा त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना कोरोना झाल्याने यांच्या कामकाजावर मर्यादा आल्याचे सांगितले जात आहे. 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तळोदा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. तालुक्यातील खेडले, बोरद, रांझणी, राणीपूर, आमलाड, चिनोदा, प्रतापपूर या गावांसह दुर्गम भागातही कोरोनाचे रुग्ण निघत आहेत. या मुळे ग्रामीण भागात गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तळोदा तालुक्यात गावनिहाय कोरोना ग्रामदक्षता समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. यात सरपंच, तलाठी, आरोग्य कर्मचारी, पोलिसपाटील, अंगणवाडीसेविका, रेशन दुकानदार, ग्रामसेवक आदींचा समावेश होता. तसेच ‘माझे गाव- माझी जबाबदारी’ या घोषवाक्यसह प्रत्येक गावात ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये सरपंच, ग्रामसेवक अथवा ग्रामविकास अधिकारी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, पोलिसपाटील, कोतवाल, मुख्याध्यापक, तलाठी, तसेच गरज भासल्यास माजी सैनिक, प्रतिष्ठित नागरिक, एनसीसी कँडेट व गावातील युवकांच्या समावेशाच्या सूचना होत्या. 

महत्‍त्‍वपुर्ण जबाबदारी
प्रशासनाच्या आदेशानुसार गावनिहाय ग्रामदक्षता समिती व ग्रामरक्षक दलाची स्थापना झाली. त्यांना कोरोना नियमांचे पालन करण्याबरोबरच नागरिकांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास त्यांना तत्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्यास सांगणे, इतर जिल्ह्यातून कोणी नागरिक आल्यास त्यास १४ दिवस घरातच विलगीकरण करणे, नागरिकांमध्ये कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याबाबत जनजागृती, कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर निगराणी ठेवणे व संपर्कातील व्यक्तींचे अलगीकरण करणे आदी महत्त्वपूर्ण जबाबदारी दिल्या होत्या. मात्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. ते पाहता ग्रामदक्षता समिती व ग्रामरक्षक दल केवळ कागदावरच असून, त्या खरोखरच आपली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडत आहेत का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या मुळे कोरोनाचा वाढता आलेख पाहता वरिष्ठांनी यात लक्ष घालून या समित्यांना प्रत्यक्षात सक्रिय करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. 
 
समितीमधील अनेकजण पॉझिटिव्ह 
ग्रामदक्षता समिती व ग्रामरक्षक दलामधील अनेक सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने किंवा त्यांच्या कुटुंबातील किंवा संपर्कातील व्यक्तींना कोरोना झाल्याने या सदस्यांच्या पर्यायाने ग्रामदक्षता समिती व ग्रामरक्षक दलाचा कामकाजावर मर्यादा आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या समित्यांमध्ये इतरांचा समावेश करता येईल का, याचा विचार होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. 

संपादन- राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com