अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

जळगाव ः परतीच्या पावसाने शेतशिवाराला जबरदस्त तडाखा दिल्याने खरीप हंगाम हातचा गेला आहे. आता हंगामासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आज मृत्यूला कवटाळले. गारखेडा (ता. रावेर) आणि वराड (ता. धरणगाव) येथील या दुर्दैवी घटना आहेत. 

वृद्धाने गळफास घेतला 
रावेर ः गारखेडा (ता. रावेर ) येथील आदिवासी वृद्ध शेतकऱ्याने आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गारखेडा या आदिवासी भागातील रेमसिंग रामसिंग बारेला (वय 60) या शेतकऱ्याने गुरांच्या गोठ्यात आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे पाचच्या सुमारास घडली. रेमसिंग यांचा मुलगा गोविंदा उठून गोठ्याकडे गेला असता, त्याला वडिलांचा मृतदेह गोठ्याच्या छताला सुताच्या दोराने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. रेमसिंग यांच्याकडे चार एकर शेती होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून होता. अतिवृष्टीमुळे फारसे उत्पन्न मिळाले नाही, तसेच काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. त्यांनी शेतात कापूस व ज्वारीची लागवड केली होती. मात्र, परतीच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या परिवाराकडून सांगण्यात आले. रेमसिंगच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र हे राठोड करीत आहे. 


विहिरीत घेतली उडी 
वराड (ता. धरणगाव) ः येथील शेतकरी आनंदा श्‍यामराव पाटील (वय 40) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल (1 नोव्हेंबर) सायंकाळी घडली. त्यांनी आईला सांगितले, की मी शेतात जाऊन येतो. मात्र, ते लवकर घरी न आल्याने शोधाशोध केली असता त्यांचा विहिरीत मृतदेह आढळून आला. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने आज सकाळी त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. त्यांना तीन मुली असून, एक मुलगी लग्नाची आहे. शेतात जास्त पाऊस पडत असल्याने शंभर पोती ज्वारीचे नुकसान झाले. कपाशी पीकही हातचे गेले. त्यामुळे कर्ज कसे फेडणार याची धास्ती घेऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांची अंत्ययात्रा उद्या (3 नोव्हेंबर) सकाळी दहाला निघणार आहे. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, तीन मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. राजू पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पाळधी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. हवालदार अमोल पाटील तपास करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com