"विधानसभा' जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठविणार दहा लाख राख्या 

live
live

नाशिक ः लोकसभेपाठोपाठ राज्यात विधानसभा जिंकण्यासाठी रक्षाबंधनपर्वाच्या माध्यमातून प्रत्येक बूथवरून दहा अशा राज्यभरातून दहा लाख राख्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे नियोजन आहे. याशिवाय राज्यात 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघात पक्षाचा कार्यक्रम पोचविण्यासाठी एक संयोजिका नियुक्त केली जाईल. कमलसखी संवादाच्या माध्यमातून लाभार्थी महिलांशी संवाद साधला जाईल, असे सूतोवाच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त झाले. 
येथील रॉयल हेरिटेज हॉटेलमध्ये भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसांच्या बैठकीला शनिवारी (ता. 29) सुरवात झाली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, महिला मोर्चाच्या महाराष्ट्राच्या प्रभारी पूजा मिश्रा, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक व महिला मोर्चाच्या प्रदेश प्रभारी उमा खापरे, महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्षा रोहिणी नायडू आदी उपस्थित होते. उद्‌घाटनानंतर प्रदेशाध्यक्षा ऍड. नाईक यांनी विधानसभा निवडणुकीचे धोरण स्पष्ट केले. 

नेतृत्व, नियोजन व मेहनतीची त्रिसूत्री 
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उद्‌घाटनपर भाषणात म्हणाले, की पंतप्रधान मोदींचे नेतृत्व, शहांचे नियोजन व कार्यकर्त्यांची मेहनत या त्रिसूत्रीवर पक्षाने मतदारांचा विश्‍वास संपादन करत मोठा विजय मिळविला. विधानसभा निवडणुकीतही त्याच पद्धतीने मतदारांसमोर जावे लागेल. लोकसभा व विधानसभेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण देण्याची भाजपची भूमिका आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाल्याने राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकार घाबरले. त्यामुळे मराठा समाजाला घाईने आरक्षण जाहीर केले. पण आरक्षण देताना मागासवर्गीय आयोग नियुक्त करावा लागतो, मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादी सरकारने नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून 16 टक्के आरक्षण जाहीर केले. कायद्याच्या चौकटीत आरक्षण टिकणारे नव्हते म्हणून भाजपने मागासवर्गीय आयोग नियुक्त करत आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकविले ही बाब लक्षात घ्यावी. 

चांगले काम, योजना पोचवा 
लोकसभा निवडणुकीत महिला मोर्चाद्वारे चांगले काम झाले. त्यामुळे सत्ता येण्यात महिलांचा वाटा मोठा राहिला, त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही त्याचप्रमाणे प्रत्येकाने काम करावे. महिलांची सुरक्षा व प्रगतीला महत्त्व देणारा भाजप एकमेव पक्ष आहे. केंद्र व राज्य सरकारने महिला, सर्वसामान्य व्यक्ती केंद्रस्थानी ठेवून योजना अमलात आणल्या. लोकसभेत 51 महिलांना उमेदवारी दिली, त्यात 41 महिला उमेदवार निवडून आल्या. जनधन योजना, माझी कन्या भाग्यश्री, अस्मिता योजना, पीडित महिलांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी राबविलेल्या योजना लोकांपर्यंत पोचविण्याचे आवाहन विजया रहाटकर यांनी केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com