Loksabha 2019 : अस्तित्वासह आव्हानांचा डोंगर करावा लागणार सर

Loksabha 2019 : अस्तित्वासह आव्हानांचा डोंगर करावा लागणार सर

राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसशी आघाडी केली. त्यामुळे धुळे मतदारसंघात कॉंग्रेसचे बळ वाढले. खांद्याला खांदा लावून या पक्षाचे नेते कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करतील. असे असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे धुळे जिल्ह्यात रचनात्मक कार्याच्या उभारणीसह विविध कार्यकारिणी बळकट करणे, वर्षभरातील घडामोडींमुळे ऋणात्मक झालेला आलेख पुन्हा उंचाविणे आणि अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. 
लो कसभेच्या धुळे मतदारसंघात केवळ बागलाणमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. धुळे महापालिकेतील या पक्षाची सत्ताही डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने हिसकावली आहे. या महापालिका निवडणुकीत व त्यापूर्वी सत्ताधारी भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही पोखरून टाकले. माजी महापौर, स्थायी समितीचे माजी सभापती, शहराध्यक्ष, काही तुल्यबळ कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला भगदाड पडले. ज्यांना या पक्षाने व नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी मोठे केले, त्यांनीच पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने नेमके चुकतेय कुणाचे, असा प्रश्‍न चर्चेत आला. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांनीही कॉंग्रेसची वाट धरल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बळ काहीसे कमी झाले. 

सर्वांनाच झटावे लागेल 
राष्ट्रवादी कॉंग्रेसला सद्यःस्थितीत धुळे शहराध्यक्ष, महिला शाखेच्या शहराध्यक्ष यासह विविध कार्यकारिणी बळकट कराव्या लागणार आहेत. महापालिका निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक नियुक्तीवेळीही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागली. त्यातून पुन्हा जे नाराज झाले, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न नेत्यांना करावा लागणार आहे. वर्षभरातील विविध घडामोडींमुळे ऋणात्मक झालेला पक्षाचा आलेख पुन्हा उंचावण्यासाठी पक्ष संघटनावर भर द्यावा लागणार आहे. पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना झटावे लागणार आहे. 

नेत्यांची जबाबदारी वाढली 
लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांत विधानसभा निवडणूक असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला येथे नियोजनबद्ध व रचनात्मक कार्य उभारावे लागणार आहे. जिल्हा सहकारी बॅंक वगळता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हातात जिल्ह्यातील कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था उरलेली नाही. याविषयी आत्मचिंतनाबरोबरच पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी नेते, पदाधिकाऱ्यांवर आली आहे. श्री. कदमबांडे व इतर सहकाऱ्यांच्या वैयक्तिक संपर्काचा कॉंग्रेसच्या उमेदवाराला लाभ होऊ शकेल. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला अस्तित्व दर्शविण्याची चांगली संधी चालून आली आहे. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये एकी आणि संघटन बळकट करता येणे शक्‍य आहे. शेतकऱ्यांसह विविध प्रश्‍न हाताळून राष्ट्रवादी कॉंग्रेसला जनतेच्या मनात स्थान टिकवून ठेवावे लागणार आहे. आव्हानांचा डोंगर पाहता ही स्थिती नेते कदमबांडे व सहकारी कशी हाताळतात याकडेही सर्वांचे लक्ष असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com