रावेर : कोरोना विषाणू, शहरातील दंगल व तालुक्यात झालेला वादळी पाऊस यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कापणीला आलेला ६० टक्के गहू, हरभरा व मका पीक कापणी व मळणी अभावी तसाच शेतात पडून असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या खरीप हंगामात कापूस, ज्वारी व खरिपाच्या इतर पिकांचा तोंडाशी आलेला घास परतीचा पाऊस व अतिवृष्टीमुळे हिरावला गेला. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. रब्बी हंगामात हे नुकसान भरून निघेल, असे वाटत असतानाच थंडी कमी पडल्यामुळे उत्पादन २० ते २५ टक्क्यांनी घटले आहे. असे असताना कोरोना ने शिरकाव करू नये, यासाठी संचारबंदी लागू केली आहे. यात (ता. २२) शहरात झालेली दंगल यामुळे शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत जमिनीचा वाफसा झाला नाही. यामुळे रब्बी गहू, हरभरा, मका पिकांची पेरणी लांबली. यामुळे मार्चअखेरजवळपास सर्वच रब्बी पिकांची कापणी, मळणी होऊन शेतकऱ्यांच्या घरात धान्य आले असते. मात्र, संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद आहेत. आतापर्यंत रब्बी पिकांची कापणी, मळणी होऊन धान्य शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे.
मजुरांची वानवा
संचारबंदीमुळे मजुरही गटागटाने येण्यास धजावत नाहीत. काही शेतकऱ्यांचा गहू, मका, हरभरा कापून मळणीसाठी शेतात पडून आहे. तर बहुतांश कापण्याचा बाकी आहे. तसेच गेल्या तीन, चार दिवसांपासून तालुक्यात कुठे ना कुठे पाऊस, वादळी तडाखा, गारपीट झाली आहे. यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या खरीप हंगामात व आताच्या रब्बी अशा दोन्ही हंगामात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.