गोदावरीचा कॉंक्रिटखाली दबलेला श्‍वास अखेर मोकळा 

live
live

नाशिक ः दक्षिणगंगा म्हणून परिचित असलेली संथ वाहणारी गोदावरी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. याच काठावर स्नान करून पूर्वापार पिंडदानापासून सर्व प्रकारची व्रतवैकल्ये केली जातात, पण सिमेंटच्या जंगलाने व्यापलेल्या नाशिकमध्ये याच गोदावरीला चहूबाजूंनी सिमेटच्या कॉंक्रिटीकरणाने विळखा दिला. अगदी आतील घाट अन्‌ कुंडेही सोडली नाहीत. खळाळणाऱ्या गोदामाईचे हेच रूप बंदिस्त झाले आणि कुंडेही गायब झाली. सिमेंट कॉंक्रिटीकरणातून याच गोदामाईला मुक्त करावे यासाठी आंदोलन, संघर्षही यापूर्वी झाला. अखेर गोदामाईचे कॉंक्रिटीकरण हटविण्यास शुक्रवारी (ता. 13) मुहूर्त लागला. आता प्रतीक्षा अधिक प्रवाहाने नदी खळाळण्याची आहे. 

अनेक मुद्दे समोर

शुक्रवारी सकाळी महात्मा गांधी तलावातील गाळ हटविण्यास सुरवात झाल्याने गोदाप्रेमींनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. सन 2003 मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने अहिल्यादेवी होळकर पूल ते टाळकुटेश्‍वर पुलापर्यंत कॉंक्रिटीकरण करण्यात आले होते. सोळा वर्षांच्या कालावधीत गोदावरीसंदर्भात अनेक मुद्दे समोर आले.

पाण्याला गती राहण्याचा उद्देश

प्रशासनाने गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याबरोबरच पाण्याला गती राहावी, या उद्देशाने कॉंक्रिटीकरण केले असले, तरी सन 2016 मध्ये दुष्काळात गोदावरी नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले होते. यापूर्वी कॉंक्रिटीकरण नव्हते त्या वेळी गोदावरीच्या पात्रात 17 कुंडे होती. या नैसर्गिक कुंडांतून पाणी बाहेर पडत असल्याने धरणातून पाणी सोडले नसले, तरी पाण्याला प्रवाह राहायचा. याच मुद्द्यावर देवांग जानी यांनी उच्च न्यायालयात कॉंक्रिटीकरण काढून टाकण्याची मागणी केली होती. 

वेळोवेळी पाठपुराव्याला यश 

न्यायालयाने स्थानिक प्रशासनाकडे दाद मागण्याचा सल्ला दिल्यानंतर स्मार्टसिटींतर्गत गोदावरी सुशोभीकरण करताना कॉंक्रिटीकरण काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात आली. कामाच्या शुभारंभाप्रसंगी गोदाप्रेमी देवांग जानी, स्मार्टसिटीचे सल्लागार शब्बीर सय्यद, प्रोजेक्‍ट मॅनेजर संजय कुमार, उदय शंकरकुमार उपस्थित होते. गुरुवारपासून गांधी तलावात पाणी सोडणे बंद करण्यात आले. शुक्रवारी पात्र कोरडे झाल्यानंतर तलावात साचलेला गाळ, वाळू व दगड व अन्य साहित्य हटविण्याचे काम पोकलॅंडच्या सहाय्याने हाती घेण्यात आले. नदीपात्रातील गाळ हटविल्यानंतर अहिल्यादेवी होळकर पूल ते गाडगे महाराज पुलापर्यंतच्या नदीपात्रातील कॉंक्रिटीकरण टप्प्याटप्प्याने हटविले जाणार आहे. प्रारंभी गोदापूजन विधी याचिकेकर्ते जानी यांच्या हस्ते झाला. रघुनंदन मुठे, चिराग गुप्ता, नंदू पवार, योगेश रामय्या व लता दायमा आदी उपस्थित होते. 

गोदावरी नदीपात्रातील 17 कुंडे पुनरुज्जीवित करण्याच्या कामाला शुक्रवारी सुरवात झाल्याने गेल्या पाच वर्षांपासूनच्या लढ्याला यश मिळाल्याचे समाधान आहे. हे यश गोदावरी नदीला समर्पित करतो. 
- देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com