एकीकडे अंगणवाडी सेविकांची भरती दुसरीकडे व्याजाने काढावे लागताय पैसे 

anganwadi
anganwadi

जळगाव : अंगणवाडी सेविकांच्या रिक्‍त पदांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामुळे निश्‍चितच अंगणवाडींचे काम दर्जेदार होवू शकेल. असे असले तरी एकीकडे भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार असून दुसरीकडे मुक्ताईनगर तालुक्‍यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. यामुळे जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी रक्कमेसाठी व्याजाने पैसे घेण्यासाठी खासगी सावकाराकडे धाव घ्यावी लागत आहे. 

एकात्मिक बाल विकास प्रकल्पातंर्गत अंगणवाडीच्या माध्यमातून शुन्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकाना पोषण आहार देण्यात येत असतो. पण येथे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांना हवे तसे मानधन मिळत नाही, ते देखील वेळेवर मिळत नसते. यामुळे घर चालविण्यासाठी व्याजाने पैसे काढण्याची वेळ अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्यावर येत असते. मुक्‍ताईनगर तालुक्‍यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे नोव्हेंबरपासून म्हणजेच तीन महिन्यांपासून मानधन रखडलेले आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे उपासमारी व आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यात दबक्‍या आवाजात चर्चा आहे. 

तरीही वेळेवर नाही मानधन 
एकात्मिक बालविकास सेवा योजनेत काम करणाऱ्या सर्व सेविकांना शासकिय दर्जा नसतांना मानसेवी असे गोंडस नाव देऊन सेविकांकडून अल्पशा मानधनावर अनेक शासकीय काम करून घेतले जाते. तसेच देशपातळीवर कुपोषणमुक्तीसाठी कार्य हाती घेतलेल्या शासकीय यंत्रणेत शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत याच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मार्फत युद्धपातळीवर कार्य सुरू आहे. तसेच पोलिओ, ग्रोव्हर व तत्सम लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविण्यात यांचाच पुढाकार दिसून येतो. असे असताना तीन महिन्यांपासून रखडलेल्या मानधनाची रक्कम तातडीने अदा करावी. 

दहा ते बारा टक्‍के व्याजदाराने रक्‍कम 
महागाईच्या काळात वेतन हातात न पडल्याने जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी खासगी सावकाराकडे धाव घेऊन 10 ते 12 टक्‍के व्याजदराने तोकडी रक्कम उचलून उदरनिर्वाहासाठी उपजीविकेचे साहित्य विकत घ्यावे लागत आहे. अशी व्यथा अंगणवाडी सेविका भगिनीने "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केली. त्यावेळी त्या भगिणीच्या डोळ्यातील अश्रू अनावर झालेले दिसून आले. त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होणारी उपासमार थांबवण्यासाठी प्रत्येक महिन्या एक तारखेला मानधन देण्यात यावे. मानधन वेळेवर न करणे यात कर्मचारी कामचुकार पणा की प्रशासनाची हलगर्जी यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com