Loksabha 2019 : देशहितासाठी वाद विसरून एकत्र या : मंत्री गिरीश महाजन 

Loksabha 2019 : देशहितासाठी वाद विसरून एकत्र या : मंत्री गिरीश महाजन 

भुसावळ : सध्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपल्यामुळे व आपले पक्ष गब्बर झाल्यामुळे आपापसांत लढणे सुरू झाले आहे, हे अमळनेरच्या प्रकारावरून सिद्ध झाले आहे. स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे, त्यापेक्षाही वरिष्ठ पातळीवर परिस्थिती कठीण होती. मात्र, देशाच्या हितासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी काळाची व राष्ट्राची गरज लक्षात घेता युती केली असल्याचे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले. 
येथील स्टार लॉन्सवर आयोजित भाजप- शिवसेना समन्वय बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री सुरेशदादा जैन, शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार चैनसुख संचेती, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, प्रा. चंद्रकांत सोनवणे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी आमदार दिलीप भोळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक पिंटू कोठारी, प्रा. सुनील नेवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हर्षल पाटील, विनोद चव्हाण, जिल्हा परिषदेच्या सदस्या सरला कोळी आदी उपस्थित होते. 
मंत्री महाजन म्हणाले, की जी परिस्थिती या विभागात आहे, तीच परिस्थिती शिवसेनेचे खासदार, आमदार आहेत तेथे भाजप कार्यकर्त्यांची आहे. संपूर्ण राज्यात अशा तक्रारी आहेत. आपण कामावर जोर देऊन जनतेत विश्‍वास निर्माण करा, असा सल्ला मित्रपक्षाच्या तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला. जामनेर व शेंदुर्णी पालिकांत मित्रपक्षाला २५ हजारांमधून १०० मतेही मिळवता येत नसतील, तर युती कोणत्या ताकदीवर करायची, असा प्रश्‍न उपस्थित केला. 
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी देशाच्या हितासाठी सर्व मतभेद विसरून काम करा, असे आवाहन युतीच्या कार्यकर्त्यांना केले. तुम्ही जे अनुभवताहेत ते मी मागील साडेचार वर्षांत अनुभवले आहे. गेल्या २५ वर्षांत युतीचा कारभार चालला, तसा तो भविष्यातही सुरू ठेवावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी राज्यमंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, विलास पारकर, खासदार रक्षा खडसे यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी, अनेक शिवसैनिकांनी मनातील खदखदही व्यक्त केली. प्रा. सुनील नेवे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. प्रा. धीरज पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com